काही व्यक्ती आपल्या आयुष्यात योगायोगाने येतात, काही नियतीने भेटतात, तर काही अशा असतात की त्यांना भेटण्यापूर्वीच आपण त्यांच्या विचारांचे, कार्याचे आणि व्यक्तिमत्त्वाचे चाहते झालेलो असतो. माझ्यासाठी लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार हे असेच एक व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्याशी माझा प्रत्यक्ष परिचय होण्याच्या कित्येक वर्षांपूर्वीपासून मी त्यांच्या कार्याचा चाहता होतो. महाविद्यालयीन जीवनात असताना त्यांची भाषणे ऐकली, त्यांच्या विकासकामांविषयी वाचले आणि समाजासाठी झटणाऱ्या त्यांच्या कार्यपद्धतीने मी भारावून गेलो. आजही माझे जुने फेसबुक खाते उघडून पाहिले, तर सुरुवातीच्या अनेक पोस्ट या सुधीरभाऊंच्या कार्याशी संबंधित दिसतात. त्या वेळी त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग कधीच आला नव्हता; पण त्यांच्या कार्याने माझ्या मनावर खोलवर छाप पाडली होती.
वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी मी विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून समाजकार्यात पाऊल ठेवले. रक्तदान शिबिरे, पर्यावरण संवर्धन, जनजागृती मोहीम, गरजूंना मदत, सामाजिक प्रश्नांवर आवाज उठविणे अशा अनेक उपक्रमांत सहभागी होत समाजसेवा हेच आयुष्याचे ध्येय ठरवले. पुढे काही काळ सक्रिय राजकारणातही काम केले. त्या काळात माझ्या मनात एकच विचार होता जर कधी नेतृत्व करण्याची संधी मिळाली, तर ते सुधीरभाऊंसारखे अभ्यासू, संवेदनशील आणि जनतेशी जोडलेले असावे.
परंतु काळाने वेगळेच चित्र दाखवले. राजकारणातील कटू अनुभव, गटबाजी, वैयक्तिक स्वार्थ आणि मूल्यांशी होणारी तडजोड पाहून मन खिन्न झाले. २०१४ मध्ये मी सक्रिय राजकारणाला रामराम करण्याचा निर्णय घेतला. मात्र समाजसेवेचा ध्यास कायम होता. म्हणूनच मी हातात लेखणी घेतली. पत्रकारिता हेच समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम मानून एका छोट्याशा पाक्षिकातून माझा प्रवास सुरू झाला. आर्थिक संकटे होती, संसाधनांची कमतरता होती, अनेकदा संघर्षाचा सामना करावा लागला; पण सत्यासाठी लिहिण्याचा निर्धार कधीच डळमळला नाही. कालांतराने हा प्रवास संपादकपदापर्यंत पोहोचला. हा प्रवास जितका संघर्षमय होता, तितकाच समाधान देणारा होता.
मात्र आयुष्याची खरी परीक्षा अजून बाकी होती. सन २०२१ हे वर्ष माझ्या आयुष्यातील सर्वांत कठीण वर्ष ठरले. एका दुर्धर आजाराने मला ग्रासले. दिवसेंदिवस प्रकृती खालावत होती. अनेक रुग्णालये पालथी घातली. असंख्य तज्ज्ञ डॉक्टरांना भेटलो. विविध तपासण्या, औषधे, उपचार आणि प्रचंड खर्च… सर्व काही करून झाले; पण प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होत नव्हती. अखेर एक दिवस असा आला की मी उपचार करण्याची इच्छाच गमावली. आता जे होईल ते होईल, या अवस्थेत मी घरी शांत बसलो होतो. त्या क्षणी आयुष्य जणू संपल्यासारखे वाटत होते.
याच काळात माझा मित्र सागर खडसे देवदूतासारखा घरी आला. त्याने मला धीर दिला. आशिषभाऊ, अजून हार मानायची नाही. आपण मुंबईला जाऊ. उपचार करू. देव मोठा आहे, एवढेच त्याने सांगितले; पण त्या शब्दांनी माझ्यात पुन्हा जगण्याची आशा जागी झाली. आम्ही मुंबई गाठण्याचा निर्णय घेतला. पण मुंबईसारख्या शहरात राहायचे कुठे, उपचार किती दिवस चालतील, खर्च कसा भागवायचा, या प्रश्नांनी मन अस्वस्थ झाले होते.
अशा वेळी माझी बहीण अरुणा जांभुळकर, कोमल फरकडे आणि गोंडपिंपरी येथील भाजप शहराध्यक्ष चेतन गौर यांनी सुधीरभाऊंशी संपर्क साधला. विशेष म्हणजे त्यावेळी माझी त्यांच्याशी प्रत्यक्ष ओळखही नव्हती. मी त्यांच्या मतदारसंघातील नव्हतो, पक्षाचा पदाधिकारी नव्हतो, त्यांच्याशी कधी भेटही झाली नव्हती. तरीही त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता मुंबईत माझ्या राहण्याची व्यवस्था करून दिली. त्या क्षणी मला जाणवले की मोठेपणा पदात नसतो; तो माणुसकीत असतो.
यानंतर हिंदुजा रुग्णालयात तपासण्यांची मालिका सुरू झाली. असंख्य रक्तचाचण्या, विविध वैद्यकीय तपासण्या, त्यांचे अहवाल… काही अहवाल दोन दिवसांनी मिळाले, काही आठवड्यानंतर तर काही महिनाभराने. सर्व अहवाल तयार झाल्यानंतर पुढील उपचारांसाठी लोकप्रतिनिधीच्या शिफारशीची आवश्यकता होती. मी अनेकांना संपर्क साधला. अनेकांना फोन केले. काहींनी प्रतिसाद दिला नाही, काहींनी वेळ मागितली, काहींनी आश्वासने दिली; पण ठोस मदत मिळाली नाही.
शेवटी मी धीर करून सुधीरभाऊंना एक फोन केला. माझी अपेक्षा फार मोठी नव्हती. कदाचित उत्तरही मिळणार नाही, असे वाटत होते. पण त्यांनी माझे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि कोणताही विलंब न करता पुढील उपचारांसाठी आवश्यक ती सर्व मदत केली. त्यांनी एकदाही विचारले नाही की मी कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या मतदारसंघातील आहे किंवा माझी त्यांच्याशी काय ओळख आहे. त्यांच्या दृष्टीने मी फक्त एक संकटात सापडलेला माणूस होतो. हेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे खरे मोठेपण आहे.
त्यानंतर जवळपास चार महिने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात माझ्यावर उपचार झाले. त्या चार महिन्यांत मी मृत्यूला जवळून पाहिले, जीवनाची खरी किंमत समजली आणि माणुसकीचे खरे रूप अनुभवले. आज देवाच्या कृपेने, डॉक्टरांच्या प्रयत्नांनी आणि सुधीरभाऊंनी दिलेल्या आधारामुळे मी पूर्णपणे निरोगी आहे. लोक म्हणतात, तू बरा झालास; पण माझ्यासाठी तो केवळ उपचार नव्हता तो माझा पुनर्जन्म होता.
आज अनेक जण मला विचारतात, तू पत्रकार आहेस की राजकारणी? माझे उत्तर एकच असते मी पत्रकार आहे आणि आयुष्यभर पत्रकारच राहीन. मात्र जेव्हा विषय सुधीरभाऊंचा येतो, तेव्हा माझी लेखणी कृतज्ञतेने भरून येते. कारण माझ्या वडिलांनी मला लहानपणापासून एक संस्कार दिला ज्यांनी संकटात साथ दिली, त्यांचे उपकार आयुष्यभर विसरू नयेत. मी हा संस्कार मनापासून जपला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या काळात सुधीरभाऊ उमेदवार असताना मी त्यांचा उघडपणे प्रचार केला. त्याचा परिणाम माझ्या पत्रकारितेवर झाला. अनेकांनी टीका केली, प्रश्न उपस्थित केले. पण मला त्याची पर्वा नव्हती. कारण मी कोणत्याही राजकीय लाभासाठी नव्हे, तर माझ्यावर उपकार केलेल्या व्यक्तीप्रती कृतज्ञता व्यक्त करत होतो. काही नाती राजकारणापलीकडे असतात आणि त्यांचा पाया माणुसकीवर उभा असतो.
आज मी जे काही करतो आहे, त्यामागे त्या एका माणुसकीच्या स्पर्शाची प्रेरणा आहे. मला लाभलेले हे आयुष्य मी पुनर्जन्म मानतो आणि हा पुनर्जन्म समाजसेवेसाठी अर्पण करण्याचा संकल्प केला आहे. याच भावनेतून १ जुलै २०२६ रोजी वरोरा येथील झोपडपट्टीतील गरजू विद्यार्थ्यांसाठी लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार सामूहिक अभ्यास केंद्र सुरू करण्यात आले. शिक्षणापासून वंचित राहू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा तयारी, व्यक्तिमत्त्व विकास आणि इंग्रजी संभाषणाचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.
तसेच १ ऑगस्ट रोजी सुधीरभाऊंच्या वाढदिवसानिमित्त भव्य महारोगनिदान व मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. माझ्यासाठी हा केवळ कार्यक्रम नाही; तर माझ्यावर झालेल्या उपकारांचे समाजसेवेच्या रूपाने केलेले ऋणफेडीचे एक लहानसे पाऊल आहे. कारण कृतज्ञता शब्दांत व्यक्त करण्यापेक्षा कृतीतून व्यक्त करणे अधिक महत्त्वाचे असते.
आज मागे वळून पाहताना मला एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवते जर त्या कठीण काळात सुधीरभाऊंनी मदतीचा हात पुढे केला नसता, तर कदाचित आज मी हे शब्द लिहितही नसतो. म्हणूनच माझ्यासाठी सुधीरभाऊ केवळ लोकनेते नाहीत; ते माझ्या नव्या आयुष्याचे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी मला जगण्याची नवी दिशा दिली, समाजासाठी जगण्याची प्रेरणा दिली आणि माणुसकीचे खरे मूल्य शिकवले.
श्री विठ्ठलाच्या चरणी एकच प्रार्थना सुधीरभाऊंना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, अखंड कार्यशक्ती आणि समाजसेवेचे अधिक सामर्थ्य लाभो. त्यांच्या हातून जनकल्याणाची असंख्य कार्ये घडत राहोत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला समाजासाठी अधिक कार्य करण्याची संधी लाभो. आणि माझ्या आयुष्याचा प्रत्येक श्वास, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कृती ही त्यांनी दिलेल्या माणुसकीच्या संस्कारांची साक्ष देत राहो.
कारण काही उपकारांचे ऋण कधीच फेडता येत नाही; ते फक्त आयुष्यभर जपावे लागते. माझ्यासाठी सुधीरभाऊ मुनगंटीवार हे केवळ एक लोकनेते नाहीत, तर माझ्या पुनर्जन्मामागचे नाव आहेत.
आशिष मारोती घुमे













