अहेरी : जिल्ह्याच्या दक्षिण भागाला छत्तीसगड आणि तेलंगणा राज्याशी जोडणाऱ्या आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग (एनएच-353 सी) वरील रखडलेल्या कामाविरोधात काही तरुणांनी गुरुवारी (6 ऑगस्ट) अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला. “राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम तातडीने पूर्ण करा” अशी घोषणा देत त्यांनी चक्क महामार्गालाच श्रद्धांजली वाहिली. या अनोख्या आंदोलनाची परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.योगेश कोतकोंडावार (रा. गुड्डीगुडम), आयुष मामीडवार व गणेश मडपेल्लीवार (दोघेही रा. अहेरी) यांनी हा अनोखा निषेध केला.
आष्टी–आलापल्ली–सिरोंचा या सुमारे १४२ किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या चार ते पाच वर्षांपासून सुरू आहे. आष्टी ते आलापल्ली या टप्प्यात काही प्रमाणात प्रगती झाली असली, तरी आलापल्ली ते सिरोंचा या सुमारे १०० किलोमीटर मार्गावरील काम अद्याप रखडले आहे. परिणामी, दर पावसाळ्यात हा मार्ग बंद पडत असून शेकडो गावांतील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
यंदाच्या पावसाळ्यात तर अवघ्या दोन महिन्यांत पाच ते सहा वेळा हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला. पुलांच्या बांधकामासाठी तयार करण्यात आलेले तात्पुरते वळण रस्ते पावसाच्या पाण्यात वारंवार वाहून जात असल्याने वाहतूक खंडित होत आहे. त्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असून संतापाची भावना तीव्र झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर तरुणांनी महामार्गालाच श्रद्धांजली वाहून संबंधित विभाग आणि कंत्राटदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. “आता तरी प्रशासन जागे होऊन या महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करेल,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
रखडलेल्या महामार्गाच्या कामामुळे सर्वसामान्य नागरिकांना दरवर्षी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या अनोख्या आंदोलनाने प्रशासनासमोर महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.













