वर्धा प्रतिनिधी :-
काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याच्या प्रकरणात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मोठी कारवाई करत पुलगाव रेल्वे स्थानकावरून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. या कारवाईला वर्धा जिल्हा पोलिस प्रशासनानेही दुजोरा दिला असून जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी याबाबत माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील हडपसर परिसरातील मल्टी स्पेशालिटी उषाकिरण हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याची घटना घडली होती. या गंभीर प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पोलिस पथक तयार करण्यात आले होते. पुणे एटीएसकडून संशयिताचा शोध सुरू असतानाच सोलापूर पोलिसांनाही संबंधित आरोपीचा तपासात शोध होता.
दरम्यान, संबंधित संशयित शालिग्राम एक्सप्रेसने प्रवास करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पुणे आणि नागपूर येथील एटीएस पथकाने संयुक्त कारवाई करत पुलगाव रेल्वे स्थानकावर सापळा रचला आणि संशयिताला ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव शिवाजी राठोड असल्याचे सांगण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, ज्या उषाकिरण हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा प्रकार घडला त्या रुग्णालयाशी वर्ध्याचे सेवानिवृत्त प्राध्यापक विजय बोबडे यांचे कौटुंबिक संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. बोबडे यांचा मुलगा आणि सून हे दोघेही त्या रुग्णालयात वैद्यकीय सेवा बजावत असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे पुण्यासह वर्धा जिल्ह्यातही खळबळ उडाली असून एटीएसकडून संशयिताची कसून चौकशी सुरू आहे. बॉम्ब ठेवण्यामागील नेमका हेतू काय होता, तसेच या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास यंत्रणांकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे।













