यवतमाळ (विशेष प्रतिनिधी) दि. 11 फेब्रुवारी रोज शुक्रवारला महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील आजी व माजी काँग्रेस पक्षाच्या आदिवासी लोकप्रतिनिधींची आखिल भारतीय काँग्रेस कमिटी, महाराष्ट्र राज्य प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्ष वाढीसाठी व राज्यातील आदिवासींच्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी सभेचे आयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे करण्यात आले होते.
या सभेला ना. ॲड. के.सी. पाडवी, मंत्री, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, माजी मंत्री, शिवाजीराव मोघे, ॲड पद्माकर वळवी, प्रा. वसंतराव पुरके तसेच . आमदार हिरामण खोसकर, शिरीषकुमार नाईकसहसराम कोरोटे तसेच माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, डॉ. संतोष टारफे, आनंदराव गेडाम, जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. सिमा वळवी व विविध जिल्ह्यातील जिल्हा परीषद, पंचायत समिती, नगरपालीका सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्रातील आदिवासी बांधव उच्चशिक्षित असुन विचारानेही प्रगल्भ आहे. त्यांच्या प्रगल्भतेसमोर मी अगोदर नतमस्तक होतो. राज्यातील आदिवासी बांधवांच्या वेदना काँग्रेस पक्षाच्या माध्यमातुन सोनियागांधी यांच्यापर्यंत पोहचविण्याचे आश्वासन एच. के. पाटील यांनी दिले. तसेच लवकरच राष्ट्रीय स्तरावरील नेते सोनिया गांधी , राहुलगांधी यांच्या सभा आदिवासीबहुल भागात आयोजित करण्याचा मी पुरेपुर प्रयत्न करीन, असे आश्वासन त्यांनी या सभेत दिले.
एकेकाळी महाराष्ट्रत 25 आदिवासी आमदारांपैकी 22 ते 23 आमदार निवडून येत असत. आणिबाणी काळखंडामध्ये कै. इंदिराजींनी आदिवासी बांधवांना केलेली मदत आजही त्यांच्या स्मरणात आहे. त्याकाळी मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजाची संपत्ती सावकारांनीं गिळंकृत केली होती. जमिन सुधारणा कायदा करून लाखो आदिवासी भुमिहिन कुटुंबांना जमिनी मिळवून दिल्या व देशातील कोट्यावधी आदिवासी बांधवांना घरे दिली. आणिबाणी काळखंडात कै. इंदिरांजींनी सर्व गेलेली संपत्ती आदिवासी बांधवांना परत मिळवून देण्यासाठी ठोस कायदा केला, म्हणून आजही आदिवासी बांधव आ. इंदिराजींना “इंदिरामाय” म्हणून ओळखतात. मात्र मध्यंतरी जातीयवादी शक्तींनी आमच्या आदिवासी बांधवांची दिशाभुल करून आदिवासी समाजाला काँग्रेस पक्षापासून दूर केले. परंतु पुनश्च हाच आदिवासी बांधव पक्षाच्या झेंड्याखाली एकवटत आहे, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
सुरवातीस मा. ना. ॲड. के. सी. पाडवी, मंत्री, आदिवासी विकास यांनी प्रास्ताविक केले. या प्रास्ताविकात शासनामार्फत आदिवासी विकासाचा लेखाजोखा मांडला. मात्र या विभागाला विकासात्मक कामांसाठी मिळणाऱ्या निधीमध्येच अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतनासाठीचा निधी समाविष्ट असल्याने दरवर्षी होणारी वाढ लक्षात घेता विकासासाठीचा निधी अपूरा पडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मागिल सरकारच्या काळात आदिवासींना दिली जाणारी खावटी कर्ज योजना बंद करण्यात आली होती. या योजनेचे पुनरूज्जीवन करून कर्जाऐवजी अनुदान स्वरूपात मदत देण्यात आली. प्रकल्पस्तरीय समित्यांवर लवकरच कार्यकर्त्याच्या नेमणुका करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले. तसेच बोगस आदिवासींच्या संदर्भात कोणतीही तडजोड करणार नाही, मी नेहमी माझ्या आदिवासी बांधवांच्या पाठमागे खंबीरपणे उभे राहीन, असे रोखठोक प्रतिपादन मा. मंत्री महोदयांनी केले.
त्याचप्रमाणे माजी मंत्री, शिवाजीराव मोघे यांनी आपल्या भाषणात प्रदेश काँग्रेसने विविध समित्या, महामंडळे विधानपरीषद, राज्यसभा या स्तरावर आदिवासी बांधवांना संधी उपलब्ध करून द्यावी, असे प्रतिपादन केले तर प्रा. माजी मंत्री वसंत पुरके यांनी आपल्या भाषणात बोगस आदिवासींचा मुद्दा उपस्थित करून शासनाने आदिवासींची रिक्त पदे भरणे, आदिवासी विकास विभागाचा अखर्चित निधी इतर विभागाकडे वळवू नये, खोट्या प्रमाणपत्र धारकांवर कारवाई करण्याचा मुद्दा उपस्थित केला. ॲड पद्माकर वळवी यांनी डी.बी.टी. पद्धत बंद करण्याची मागणी केली. कुसुमताई आलाम, किरण कुमरे आदींनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले व उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात बहुजन समाज पक्षाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष व बिरसा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष दशरथ मडावी यांचा एच. के. पाटील यांच्या हस्ते आपल्या हजारो समर्थकांसह काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश केला.
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील प्रमुख प्रतिनिधी या कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्र संचलन प्रदेश काँग्रेस सरचिटणीस, प्रा. प्रकाश सोनवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी केले.
अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत आदिवासी सेल अध्यक्ष आनंदराव गेडाम यांनी दिली.