चंद्रपूर | प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात महत्त्वाची घडामोड घडली असून, भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे महामंत्री म्हणून कार्यरत असलेले आशिष रणदिवे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. मुंबई येथील ‘मातोश्री’वर ७ ऑगस्ट रोजी पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रणदिवे यांचा पक्षप्रवेश झाला. या प्रवेशामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता नवे वळण मिळाले आहे.
यावेळी शिवसेना नेते खासदार विनायक राऊत, आमदार मिलिंद नार्वेकर, प्रशांत कदम यांच्यासह चंद्रपूर जिल्हाप्रमुख भास्कर ताजने, उपजिल्हाप्रमुख अमित निब्रड, संपर्कप्रमुख दिलीप कदम, विधानसभा प्रमुख बंडू डाखरे, भद्रावती तालुकाप्रमुख नरेश काळे, तालुका संघटक सचिन डुकरे, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, चिमूर तालुकाप्रमुख वैभव ठाकरे, ब्रह्मपुरी तालुकाप्रमुख नरेंद्र गाडगीलवार, ब्रह्मपुरी शहरप्रमुख भूषण रामटेके, माजी उपजिल्हाप्रमुख मिलिंद भन्नारे, युवासेना शहरप्रमुख सुरेश ठवरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आशिष रणदिवे यांनी सांगितले की, नगरपरिषद निवडणुकीपूर्वी ते भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे महामंत्री म्हणून कार्यरत होते. या काळात भाजपच्या विविध संघटनात्मक उपक्रमांमध्ये तसेच निवडणुकीच्या कामात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. कामगारांना संघटित करण्यासाठीही आपण सातत्याने काम केल्याचे रणदिवे यांनी स्पष्ट केले.
मात्र नगरपरिषद निवडणुकीच्या काळात आपल्यावर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाल्याने ऐनवेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा एबी फॉर्म स्वीकारून मशाल चिन्हावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. नगरपरिषद निवडणुकीत ‘मशाल चिन्हावर निवडणूक लढविल्याची बाब रणदिवे यांनी स्पष्टपणे मान्य केली आहे. मात्र त्या वेळी आपला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात अधिकृत प्रवेश झालेला नव्हता, याकडे त्यांनी लक्ष वेधले.निवडणुकीतील राजकीय निर्णय आणि पक्षातील अधिकृत प्रवेश या दोन वेगळ्या बाबी असून, त्यावेळची राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन आपण निवडणूक लढविल्याचे रणदिवे यांनी सांगितले.
मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जाहीर प्रवेश
७ ऑगस्ट रोजी मुंबई येथील ‘मातोश्री’वर पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आशिष रणदिवे यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश झाला. पक्षाच्या अधिकृत सामाजिक माध्यमांवरूनही त्यांच्या पक्षप्रवेशाची माहिती प्रसारित करण्यात आली.
या प्रवेशामुळे आपल्या राजकीय भूमिकेबाबत आता कोणताही संभ्रम नसल्याचे रणदिवे यांनी स्पष्ट केले. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर विश्वास ठेवून आपण शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला असून, आगामी काळात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चुकीच्या बातम्यांमधून संभ्रम पसरविल्याचा आरोप
आपल्या पक्षप्रवेशाची अधिकृत माहिती पक्षाच्या सामाजिक माध्यमांवरून प्रसारित झाल्यानंतर काही आजी-माजी पदाधिकाऱ्यांकडून आपल्याबाबत चुकीची माहिती माध्यमांना दिली जात असल्याचा आरोप रणदिवे यांनी केला आहे.
माझ्या पक्षप्रवेशाची अधिकृत माहिती पक्षाच्या सामाजिक माध्यमांवरून प्रसारित झाल्यानंतर काही आजी-माजी पदाधिकाऱ्यांकडून माझ्याबाबत चुकीची माहिती पसरविण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. सत्यता पडताळून न पाहता काही माध्यमांमध्ये माझ्याबाबत बातम्या प्रसिद्ध करून माझी बदनामी करण्याचा आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप रणदिवे यांनी केला.













