गडचिरोली:रस्ते हे केवळ गावांना जोडणारे मार्ग नाहीत, तर शिक्षण, आरोग्य, बाजारपेठ आणि शासकीय सेवांपर्यंत पोहोचण्याची नागरिकांची जीवनवाहिनी आहेत. मात्र, याच जीवनवाहिन्यांची अवस्था बिकट झाली तर सर्वसामान्यांच्या रोजच्या जगण्यावर त्याचा थेट परिणाम होतो. सध्या अशीच भयावह परिस्थिती मुलचेरा तालुक्यातील प्रमुख मार्गांची झाली असून, खड्ड्यांनी अक्षरशः रस्त्यांवर साम्राज्य निर्माण केले आहे. त्यातच एका पुलाला पडलेल्या मोठ्या भगदाडामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.
मुलचेरा तालुका मुख्यालयाला आष्टी, आलापल्ली आणि घोट यासह विविध गावांना जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था कायम आहे. आलापल्लीकडून मुलचेराकडे येताना गोमणीनंतरचा रस्ता तर वाहनचालकांसाठी अक्षरशः जीवघेणा ठरत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोलीच लक्षात येत नाही. परिणामी अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे.
मुलचेरा हे तालुका मुख्यालय असल्याने परिसरातील खेड्यापाड्यांमधील नागरिकांना दररोज विविध शासकीय, वैद्यकीय, शैक्षणिक आणि बाजारपेठेच्या कामांसाठी मुलचेरा गाठावे लागते. मात्र खराब रस्त्यांमुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे या मार्गावरील एसटी बससेवाही कमी झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पुलाला पडले मोठे भगदाड
वाहनचालकांचा जीव टांगणीला
गणेशनगरनंतर मुलचेराजवळ असलेल्या एका पुलाच्या दोन्ही बाजूंना मोठे भगदाड पडले आहे. या ठिकाणाहून चारचाकी वाहनांची वाहतूकही अत्यंत धोकादायक झाली आहे. समोरासमोर दोन वाहने आल्यास एक वाहन थांबवल्याशिवाय दुसऱ्या वाहनाला पुढे जाणे कठीण होत आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.दरम्यान, पुलाजवळील मोठ्या खड्ड्याची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी तत्परता दाखवत त्या ठिकाणी बॅरिकेड लावले आहेत. त्यामुळे प्रवाशांना धोकादायक ठिकाणाची कल्पना येत असली तरी कायमस्वरूपी उपाययोजना कधी होणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
रस्त्यांची कामे मंजूर; मात्र दिलासा पावसाळ्यानंतरच!
नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात मुलचेरा तालुक्यातील अनेक रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीही उपलब्ध झाला आहे. मात्र प्रत्यक्ष कामे पावसाळ्यानंतर सुरू होणार असल्याने सध्या नागरिकांना याच खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करावा लागणार आहे.एकीकडे रस्त्यांची कामे मंजूर झाल्याने भविष्यात दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे; मात्र तोपर्यंत पावसाळ्यातील खड्डे, पुलावरील भगदाड आणि वाढता अपघाताचा धोका यांचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे. त्यामुळे ‘काम मंजूर झाले, आता प्रत्यक्ष काम कधी?’ असा प्रश्न मुलचेरा तालुक्यातील नागरिकांकडून उपस्थित होत आहे.













