गडचिरोली : माओवादाच्या हिंसक वाटेवरून मुख्य प्रवाहात परतलेल्या 50 आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना आज गडचिरोली पोलिसांनी त्यांच्या मूळ जिल्ह्यात सुरक्षितपणे रवाना केले. यानिमित्त गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यात माओवादीविरोधी अभियानाला मोठे यश मिळाले असून, पोलीस दलाच्या अभिलेखावर सध्या एकही सशस्त्र माओवादी शिल्लक नसल्याचे पोलिसांनी सांगितले. शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन धोरणाला गडचिरोली पोलिसांच्या प्रभावी अभियानाची जोड मिळाल्याने आतापर्यंत तब्बल 819 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.आत्मसमर्पणानंतर या सदस्यांचे समाजाच्या मुख्य प्रवाहात पुनर्वसन व्हावे, यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या धोरणानुसार आर्थिक मदत, शासकीय व कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता, रोजगार, स्वयंरोजगार आणि कौशल्य प्रशिक्षणाचे लाभ देण्यात आले.
विशेष म्हणजे, ‘प्रोजेक्ट संजीवनी’च्या माध्यमातून आत्मसमर्पित सदस्यांना केवळ आर्थिक मदत न देता नव्याने आयुष्य उभे करण्याची संधी देण्यात आली. आरोग्य तपासणी, नेत्रोपचार, आवश्यक शस्त्रक्रिया, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन, योग व ध्यान शिबिरे अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यावर भर देण्यात आला.
या उपक्रमांतर्गत आतापर्यंत 46 आत्मसमर्पित माओवादी जोडप्यांचे सामूहिक विवाह लावून देण्यात आले आहेत. तसेच 88 आत्मसमर्पित सदस्यांना लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीत कौशल्य विकास प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.
यावेळी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी आत्मसमर्पित सदस्यांनी आपल्या कौशल्याचा उपयोग करून आत्मनिर्भर व्हावे, कुटुंबासोबत सुरक्षित व सुखी जीवन जगावे आणि समाजात सन्मानाने पुढे जावे, असे आवाहन केले. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गडचिरोली पोलीस दल कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमात आत्मसमर्पित सदस्यांनी मनोगत व्यक्त करताना पोलिसांकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.













