अहेरी: आलापल्ली बसस्थानक परिसरात काही खासगी वाहनधारकांकडून प्रवाशांना त्रास दिला जात असल्याचा आरोप करीत आदिवासी विद्यार्थी एकता मंचाने बसस्थानकासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
बसस्थानक परिसरात खासगी वाहनधारकांकडून अनधिकृतपणे वाहने उभी केली जात असल्याने एसटी बस व प्रवाशांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. तसेच काही वाहनचालक प्रवाशांशी अरेरावीची भाषा वापरत असून, अवाजवी भाडे आकारणे तसेच धमकी देण्याचे प्रकार होत असल्याचे मंचाचे म्हणणे आहे.या पार्श्वभूमीवर बसस्थानक परिसरात कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी तैनात करावा, वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करावी, तसेच महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी महिला पोलीस कर्मचारी उपलब्ध करून द्यावा, अशा मागण्या आंदोलनकर्ते कैलास कोरेत यांनी केल्या आहेत.
खासगी वाहनचालकांकडून प्रवाशांकडून आकारण्यात येणाऱ्या भाड्याची तपासणी करून नियमबाह्य वर्तन करणाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच प्रवाशांना धमकी अथवा त्रास देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.
मागण्यांची तातडीने दखल घेऊन ठोस कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका आदिवासी विद्यार्थी एकता मंचाने घेतली आहे. त्यामुळे बसस्थानक परिसरात प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.













