वैजापूर, प्रतिनिधी – अर्जुन शिंदे
गोदावरीच्या पुरामुळे शेकडो कुटुंबं अडकली, शेतकऱ्यांची शेती वाहून गेली, घरं उद्ध्वस्त झाली… आणि या संकटकाळात ज्यांच्या खांद्यावर जबाबदारी होती, तो महसूल अधिकारी मात्र बेपत्ता! या बेफिकीरीचा शेवट अखेर निलंबनात झाला आहे. वैजापूर तालुक्यातील पुरणगाव येथील तलाठी अमोल पोपट काळे यांना उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड यांनी तात्काळ निलंबित केले आहे.
२८ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला. नारायणपूर परिसरातील अनेक कुटुंबं पुराच्या पाण्यात अडकली होती. गावकरी मदतीसाठी ओरडत होते, फोन करत होते, पण संबंधित महसूल अधिकारी कुठेच दिसत नव्हते.
आम्ही पाण्यात अडकून मदतीसाठी हाक मारत होतो, पण तलाठी काळे कुठेच दिसले नाहीत,असा आक्रोश गावकऱ्यांनी व्यक्त केला.
याच दिवशी पंचायत समिती सभागृहात पूरग्रस्तांच्या पंचनामे आणि मदतीवर महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र ग्राम महसूल अधिकारी काळे यांनी वरिष्ठांची परवानगी न घेता ही बैठक दांडी मारली. पूरग्रस्त जनतेसाठी ही बेपर्वाई म्हणजे थेट विश्वासघात ठरला.
पूरपरिस्थितीचा तडाखा
- ३५ गावे पाण्याने वेढली
- १२०० हेक्टर शेतीपिकांचे नुकसान
- ४०० घरे पाण्याखाली
- शेकडो कुटुंबं सुरक्षितस्थळी हलविण्यात आली
गावकऱ्यांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही काळे यांच्या कामकाजात सुधारणा झाली नव्हती. “कागदोपत्री काम करून प्रत्यक्षात गायब राहणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे आम्हाला सतत फटका बसत होता,” असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
नारायणपूरच्या घटनाक्रमानंतर अखेर उपविभागीय अधिकाऱ्यांनी धडाकेबाज निर्णय घेत तलाठी काळे यांना तात्काळ निलंबित केले.
शासन सेवेत हलगर्जीपणा अजिबात सहन केला जाणार नाही. जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा डॉ. अरुण जऱ्हाड यांनी दिला.
या कारवाईमुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, जनतेचा आक्रोश प्रशासनाच्या कानावर गेल्याचे स्पष्ट झाले आहे.













