नागपूर: मोबाईलच्या अतिवापरामुळे तरुणाईचे मानसिक आरोग्य बिघडत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. नागपुरातील कळमना परिसरातील एका १६ वर्षीय मुलाने मोबाईल वापरण्यास आईने मनाई केल्यामुळे चिडून घर सोडल्याची घटना घडली आहे. मुलाला छत्तीसगडच्या राजनांदगाव येथून शोधून आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
कळमना हद्दीत राहणाऱ्या ४३ वर्षीय महिलेला तिचा मुलगा अभ्यासाऐवजी दिवसभर मोबाईलवर वेळ घालवत असल्याचे दिसत होते. त्यामुळे तिने त्याला मोबाईल वापरण्यास मनाई केली. यामुळे चिडून मुलाने १२ नोव्हेंबर रोजी घरातून पलायन केले. रात्र झाली तरी मुलगा घरी परतला नसल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. मात्र, मुलगा न सापडल्याने आईने कळमना पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीने फूस लावून मुलाला पळवून नेल्याची तक्रार दाखल केली.
तांत्रिक तपासाद्वारे शोध
पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाने तांत्रिक तपास सुरू केला. तपासादरम्यान मुलगा छत्तीसगडच्या राजनांदगाव येथे असल्याचे समजले. तेथे त्याचे नातेवाईक राहत असल्याचे देखील उघड झाले.
महिला पोलिस निरीक्षक ललिता तोडासे, सहायक फौजदार राजेंद्र अटकाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ राजनांदगाव गाठून मुलाला ताब्यात घेतले. त्यानंतर मुलाला सुरक्षितपणे नागपूरला आणून कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.
पालकांनी संवाद वाढवावा
मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये मानसिक ताण आणि घरातील वादविवाद वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अशा घटनांमधून पालकांनी आपल्या मुलांसोबत संवाद वाढवून त्यांच्या समस्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.













