गडचिरोली: वारंवार निवेदन देऊन आणि आंदोलनं करुनही विजेची समस्या सुटत नसल्याने कोरची तालुक्यातील सरपंच संघटना आणि शेतकरी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे.
आज सरपंच संघटना आणि शेतकरी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांची भेट घेऊन निवेदन दिले. कोरची तालुक्यात १२ ते १४ तास भारनियमन होत असल्याने उन्हाळी धानपीक करपले आहे. या शेतकऱ्यांना हेक्टरी मदत करावी, कुरखेडा येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रातून कोरची तालुक्याला वीजपुरवठा करण्यात येतो. प्रत्यक्षात हा वीजपुरवठा कमी असल्याने कृषिपंप सुरु होत नाही. त्यामुळे कुरखेडा येथे १३२ केव्ही, कोरची येथे ६६ केव्ही आणि ढोलडोंगरी येथे ३३ केव्ही उपकेंद्राची निर्मिती करावी, महावितरणविरोधात आंदोलन करणारे शेतकरी आणि नागरिकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे, २०२० पासून कृषिपंपाच्या जोडणीसाठी डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ जोडणी द्यावी इत्यादी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
शिष्टमंडळात सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष धनिराम हिडामी, सचिव सुनील सयाम, शेतकरी परिषदेचे अध्यक्ष नंदकिशोर वैरागडे,सचिव सुरेश काटेंगे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. एकीकडे प्रशासन प्रत्येक नागरिकास मतदान करण्याचे आवाहन करीत आहे, तर दुसरीकडे विजेच्या समस्येवर नागरिक बहिष्काराचे हत्यार उपसत असल्याने प्रशासनाला मतदानासाठी ठोस पावले उचलावी लागणार आहेत.