गडचिरोली:नुकतेच अहेरी तालुक्यातील रेपनपल्ली उप पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलाच्या सी-६० जवानांनी चार माओवाद्यांना कंटास्नान घातले. याची दखल घेऊन पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला पुन्हा एकदा गडचिरोली जिल्हात हजेरी लावून सी-६० पथकातील अधिकारी व जवानांच्या साहस व शौर्याचे कौतुक करत प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केले.
यावेळी त्यांनी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना गडचिरोली पोलीस दलातील सी-६० कमांडो तसेच अधिकारी वर्ग यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांचे मनोबल वाढविले. सोबतच गडचिरोली जिल्ह्यातून माओवाद घालविण्याची जबाबदारी आपली असून आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक ही व्यवस्थित पार पडणार अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच माओवाद विरोधी अभियानामध्ये आपल्या कोणत्याही जवानाला इजा झाली नाही ही निश्चित चांगली बाब असून येत्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना अजून जास्त सतर्क राहून एकत्रित मिळून काम करायचे आहे त्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे असे आवाहन देखील केले.
महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या अगोदर मागील महिन्यात त्या दोनदा गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या.सुरुवातीला त्यांनी वांगेतुरी आणि गर्देवाडा येथे भेट दिल्या तर दुसऱ्या दौऱ्यात त्यांनी मन्नेराजाराम आणि भामरागड पोलीस ठाण्याला भेट दिली होती.परत एकदा त्या २२ मार्च रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी गडचिरोली पोलीस मुख्यालयात आढावा बैठक घेतल्या. या बैठकीत त्यांनी आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने देशभरात १६ मार्च पासून आदर्श आचारसंहिता लागू असून ही निवडणूक शांततामय वातावरणात यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मार्गदर्शन केल्या. तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माओवाद्यांच्या असंवैधानिक कृतींना आळा बसविण्यासाठी योग्य व्युवरचना आखण्यात आले.
यावेळी अप्पर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) म.रा. संजय सक्सेना, अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) म.रा. प्रवीण साळुंके,आयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग म.रा. शिरीष जैन, पोलीस उप महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल,गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल प्रामुख्याने उपस्थित होते.