साप्ताहिक सह्याद्रीचा राखणदार टीम
यवतमाळ : क्षुल्लक कारणातून वाद उपस्थित करून मद्यपी जावयाने सासऱ्याला काठीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. यामध्ये सासऱ्याचा मध्यरात्री मृत्यू झाला. ही घटना २८ जून रोजी रात्रीच्या सुमारास घडली. दत्ता बापुराव मरापे असे मृत सासऱ्याचे नाव आहे. तर रविंद्र रामदास आडे असे मारेकऱ्याचे नाव आहे. आरोपी रविंद्र आडे हे आपली पत्नी व दोन मुले व सासऱ्यासह घाटंजी शहरातील पांढूर्णा रोडवर असलेल्या उपलेंचवार यांच्या शेतातील कोठ्यात मागील महिन्याभरापासून शेतगडी म्हणून राहत होता.
२८ जून रोजीला सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अनिता व वडील दत्ता मरापे हे शेतीच्या विषयावर बोलत होते. तेव्हाच रवींद्र आडे दारू पिवून तिथे आला. व तुम्ही दोघे माझ्याच चुगल्या करीत आहात असे म्हणून सासरे दत्ता मारपे यांनी काठीने मारू लागला. दरम्यान अनिता ही वाद सोडविण्यास गेली असता तिला देखिल मारहाण केली. या मारहाणीत सासरे दत्ता यांना प्रचंड रक्तस्त्राव झाला. प्रकरण अंगलट येत असल्याचे समजताच रविंद्रने पत्नीला या गोष्टीची कुठे वाच्यता केल्यास तुला मारून टाकीन असे म्हणून तो निघून गेला.
त्यानंतर अनिताने चिखलवर्धा येथे फोन करुन भावाला घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच भावाने घाटंजी गाठून वडीलांना सांयकाळी ७ वाजताच्या सुमारास घाटंजी येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ नेले. परंत प्रक्रूति गंभीर असल्याने डॉक्टरांनी वडिलांना यवतमाळ येथे ऊपचारासाठी नेण्याचे सांगितले. मात्र, पैशांची सोय होत नसल्याने वडिलास परत शेतातील गोठ्यात नेले. यातच रात्री एक वाजता वडिलांची प्राण ज्योत मावळली. घटनेनंतर दुपारी अनिता आणि तिच्या भावांनी घाटंजी पोलिसात रितसर तक्रार दाखल केली. पुढील तपास ठाणेदार मनीष दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पि एस आय विलास सिडाम करीत आहेत