सुमित हेपट मारेगाव(यवतमाळ ) :- यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील ४४ हजार कृषी क्षेत्रापैकी सहा हजार हेक्टर कृषी क्षेत्रात सोयाबीन लागवड होत असुन पेरणी केली असता सोयाबीन उगवलेच नाही अशी ओरड शेतकऱ्यातून होत आहे. अधिकृत विक्रेत्याकडून नामांकित सोयाबीन बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांनी पेरणी केली परंतु उगवले नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे दाद मागितली आहे
मारेगाव तालुक्यातील एकूण क्षेत्राफळापैकी ४४ हजार हेक्टर जमीन कृषी क्षेत्रात येत असुन सहा हजार क्षेत्रात सोयाबीनचा पेरा होणार आहेत.शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी करीत असतांना पेरणीला सुरवात केली. यात सोयाबीन पेरले असता उगवले नसल्याने शेतकऱ्यात दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. एका नामांकित कंपनीचे बियाणे शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करून पेरणी केली असता उगवले नसल्याने कृषी विभागाकडे तक्रार दाखल केली असून सदर शेतातील पंचनामा करण्याकरता विनंती करण्यात आली आहे, प्रशासनाकडून दखल देण्यात यावी करिता विनवणी करण्यात आली आहे.मारेगाव तालुक्यातील मार्डी परिसरातील शेतकऱ्यांनी नामांकित कंपनीचे सोयाबीन बियाणे पेरणी केली असता आठ दिवसाचा कालावधी उलटून गेला तरी अंकुरले नाही, परंतु दुसऱ्या नामांकित कंपनीचे सोयाबीन बियाणे पेरली असता अंकुर फुटून झाडांची वाढ होत आहे. त्यामुळे ही बियाणे पेरणी योग्य नसल्याचे स्पष्ट झाले. सोयाबीन बियाणे अंकुरले नसल्याने शेतकऱ्याला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. कृषी विभागाने शेतात जाऊन पंचनामा करून तात्काळ निर्णय द्यावा असे तक्रारीत नमूद केले आहे.तक्रारीत मार्डी परिसरातील वडगाव येथिल शेतकरी विजय खामनकर,रामदास ठावरी, गणेश ठावरी, दिवाकर कोल्हे, गोपाळ ठावरी,संजय फरताडे, अंबादास ठावरी, संजय येरमे, दीपक ठावरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
प्रतिक्रिया
या शेताची पाहणी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल सादर करू.100 मि.मी. पाऊस होई पर्यंत पेरणी करू नये असे फर्मान कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना करण्यात आले होते. बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी करून पेरणी करण्यात यावी असे मार्गदर्शन करण्यात आले होते. तरी सदर बाबीचा तपास करण्यात येईल.
सुनील निकाळजे
तालुका कृषी अधिकारी
मारेगाव