तळोधी (बा.) वार्ताहर :–
नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. गिरगाव येथील रहिवासी आत्माराम दसरू बोरकर (वय ५२) यांचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. हरवलेल्या एका शेळीच्या शोधासाठी पुन्हा जंगलात गेलेल्या आत्माराम यांना आपला जीव गमवावा लागल्याने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आत्माराम बोरकर हे गुरुवारी (दि. १८ जून) नेहमीप्रमाणे आपल्या शेळ्या चारण्यासाठी जंगलात गेले होते. सायंकाळी घरी परतल्यानंतर एक शेळी जंगलातच राहिल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पशुपालन हा त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा महत्त्वाचा आधार असल्याने त्यांनी कोणतीही तमा न बाळगता हरवलेल्या शेळीच्या शोधासाठी पुन्हा जंगलाची वाट धरली. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते.
रात्र झाली तरी आत्माराम घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली. पत्नी, मुले आणि नातेवाईकांनी रात्रभर त्यांच्या प्रतीक्षेत डोळे लावून ठेवले. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी जंगल परिसरात शोधमोहीम सुरू केली असता त्यांचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात वाघाच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. ही बातमी गावात पोहोचताच संपूर्ण गिरगाववर शोककळा पसरली.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक महेश गायकवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी ए. आर. कन्नमवार, क्षेत्र सहाय्यक हिंगणघर, पोलीस निरीक्षक राहुल गुहे व त्यांचे पथक तसेच वनविभागाचे मागवा मजूर घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली असून मृताच्या कुटुंबीयांना शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
आत्माराम बोरकर हे अत्यंत कष्टाळू, मनमिळावू व शांत स्वभावाचे शेतकरी म्हणून परिसरात परिचित होते. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावाने एक मेहनती व सज्जन व्यक्तिमत्त्व गमावले आहे. घराबाहेर पडताना आपल्या प्रियजनांना तो शेवटचा निरोप ठरेल, याची कल्पनाही त्यांना नव्हती. एका मुक्या प्राण्याच्या शोधासाठी गेलेला हा शेतकरी कायमचा निघून गेल्याने गावकऱ्यांचे डोळे अश्रूंनी भरून आले आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे जंगलालगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन्यप्राण्यांचा वाढता वावर आणि मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून वनविभागाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.













