मुल प्रतिनिधी
मुल येथील प्रसिद्ध श्री स्वामी समर्थ मंदिर, हनुमान मंदिर तलावपाळ येथील १५ वर्षांपासूनचे अध्यक्ष नितीन येरोजवार यांनी आज तडकाफडकी राजीनामा देत तो मंडळाचे सचिव विजय बटे यांच्याकडे पाठविला आहे.
मागील १५ वर्षांपासून मुल येथील श्री स्वामी समर्थ महाराज मंदिराची स्थापना नितीन येरोजवार यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत यशस्वीपणे करण्यात आली. या मंदिराच्या निमित्ताने हजारो भाविक मंदिराशी जोडले गेले. सर्व पदाधिकारी व सदस्य मिळून सर्व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडत होते. मागील काही वर्षांपासून काही गोष्टी घडत होत्या, त्या अध्यक्षपदाला पचनी पडत नव्हत्या.
श्री स्वामी समर्थ भक्तीसेवा समितीचे अध्यक्ष नितीन येरोजवार हे प्रामाणिक व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी स्वामी समर्थ मंडळाचा आर्थिक व्यवहार कडक शिस्तीत ठेवला होता. त्यामुळे आज मंदिराच्या ठेवी मुबलक असून आर्थिक व्यवहार सुरळीत आहेत.
नितीन येरोजवार यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, या मंडळासाठी मी गेल्या १५ वर्षांपासून स्वामी चरणी निस्वार्थ भावनेने सेवा अर्पण केली आहे. त्यामुळेच आज मी या शिखरावर पोहोचलो आहे, हे मी कधीही विसरू शकत नाही. मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे मी अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. यापुढे माझे नाव अथवा माझा उल्लेख कोणत्याही मंडळाच्या समितीत करू नये. तसेच मी कोणत्याही सदस्याला दोष देत नाही, कारण सर्व सदस्य स्वामीभक्त असून निस्वार्थपणे सेवा करतात, असे त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले.













