अहिल्यानगर : २८ मेच्या अंकात ‘दैनिक सह्याद्रीचा राखणदार’ने अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ होण्याचे भाकीत वर्तवले होते. ‘अहिल्यानगरच्या राजकारणात मोठा भूकंप?’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्तातील अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रमुख नेते, माजी मंत्री तथा जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे यांनी ३० मे रोजी भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश करत राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली.
मुंबई येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील आणि अन्य वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत तनपुरे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. विशेष म्हणजे, त्यांच्या विधान परिषद उमेदवारीचीही जोरदार चर्चा असून ती जवळपास निश्चित मानली जात आहे.
या पक्षप्रवेशामुळे शरद पवार गटाला अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अभ्यासू, आक्रमक आणि प्रभावी नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या प्राजक्त तनपुरे यांच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील तसेच राज्यातील राजकीय समीकरणांवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कर्डीले ते तनपुरे; डॉ. सुजय विखेंचा ‘डबल स्ट्राइक’
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डीले यांना उमेदवारी मिळवून देण्यापासून ते त्यांना विजयी करण्यापर्यंतच्या संपूर्ण राजकीय प्रक्रियेत डॉ. सुजय विखे पाटील यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली गेली. पक्ष नेतृत्वाशी सातत्यपूर्ण समन्वय, संघटनात्मक बांधणी आणि प्रचार यंत्रणा उभारण्यात त्यांनी घेतलेली मेहनत कर्डीले यांच्या विजयामागील प्रमुख कारणांपैकी एक मानली जाते.तब्बल अकरापेक्षा अधिक सभा घेत त्यांनी राहुरी, नगर आणि पाथर्डी परिसरात भाजप कार्यकर्त्यांना एकत्रित केले. परिणामी अक्षय कर्डीले यांच्या विजयासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले. याच राजकीय प्रक्रियेचा पुढचा टप्पा म्हणजे प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश असल्याची चर्चा आता जोर धरत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राहुरी पोटनिवडणुकीची घोषणा होण्याच्या अनेक महिन्यांपूर्वीपासूनच डॉ. सुजय विखे पाटील आणि प्राजक्त तनपुरे यांच्यात संवाद सुरू होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या समन्वयातून या राजकीय समीकरणाला अंतिम स्वरूप मिळाल्याचे बोलले जात आहे.
‘सह्याद्रीचा राखणदार’चे विश्लेषण ठरले अचूक
२८ मेच्या अंकात ‘अहिल्यानगरच्या राजकारणात मोठा भूकंप?’ या मथळ्याखाली ‘तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण’ हे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्या वृत्तामध्ये तनपुरे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबरोबरच त्यांच्या विधान परिषद उमेदवारीचीही शक्यता वर्तविण्यात आली होती.३० मे रोजी झालेल्या अधिकृत पक्षप्रवेशानंतर त्या वृत्तातील अंदाज आणि विश्लेषण अचूक ठरल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ‘दैनिक सह्याद्रीचा राखणदार’ने केलेले राजकीय भाकीत पुन्हा एकदा खरे ठरल्याची चर्चा जिल्हाभर सुरू आहे.
बदलत्या राजकीय समीकरणांची नांदी
एकीकडे अक्षय कर्डीले यांना विधानसभेत पाठविण्यात यश मिळवणे आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रभावी चेहरा असलेल्या प्राजक्त तनपुरे यांना भाजपमध्ये आणणे, या दोन्ही घडामोडींमुळे डॉ. सुजय विखे पाटील यांचे जिल्ह्यातील राजकीय वजन अधिक वाढल्याचे मानले जात आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, विधान परिषद निवडणूक आणि पुढील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडी अहिल्यानगरच्या राजकारणाला नवी दिशा देणाऱ्या ठरणार आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते, तनपुरे यांच्या भाजप प्रवेशामुळे राहुरीसह संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून भाजपची संघटनात्मक ताकद आणखी मजबूत होणार आहे. त्यामुळे आगामी काळात अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारण अधिक रंगतदार, चुरशीचे आणि नव्या समीकरणांनी परिपूर्ण होणार, हे निश्चित मानले जात आहे













