बीड : पाकिस्तानस्थित गँगस्टर शहजाद भट्टीच्या सिंडिकेटशी संबंध असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) राज्यभर धडक कारवाई सुरू केली असून बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात दोन तरुणांची चौकशी करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना जाळ्यात ओढण्याचा प्रकार उघडकीस आल्याने सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत.
बुधवारी पहाटे एटीएसच्या पथकाने आष्टी तालुक्यातील आष्टा गावातील दोन तरुणांच्या घरावर छापा टाकत त्यांच्या मोबाईल आणि डिजिटल व्यवहारांची तपासणी केली. संबंधित तरुणांचे मोबाईल क्रमांक संशयितांच्या संपर्क यादीत आढळल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पथकाने दिवसभर मोबाईलमधील डेटा, सोशल मीडिया अकाउंट्स तसेच आर्थिक व्यवहारांची पडताळणी केली. प्राथमिक तपासात कोणताही आक्षेपार्ह पुरावा समोर न आल्याने चौकशीनंतर दोघांनाही सोडून देण्यात आले. मात्र, या घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, एटीएसने राज्यातील विविध जिल्ह्यांत एकाचवेळी कारवाई करत ५३ संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतील तरुणांचीही चौकशी करण्यात आली असून संशयास्पद डिजिटल व्यवहार आणि परदेशी संपर्कांबाबत तपास सुरू आहे.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, दुबईतून कार्यरत असलेला शहजाद भट्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याशी संपर्क वाढवत होता. काही तरुणांचे ‘डिजिटल ब्रेनवॉश’ करून देशविरोधी कारवायांसाठी वापरण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी या कारवाईचे कौतुक करत दोषींवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास एटीएसचे वरिष्ठ अधिकारी करत असून आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.












