बदलापूर प्रतिनिधी : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ–बदलापूर परिसर हा मोठ्या प्रमाणावर औद्योगिक वसाहतीसाठी ओळखला जातो. अंबरनाथमधील आनंदनगर परिसर हा प्रमुख औद्योगिक पट्टा असून येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) मोठी औद्योगिक वसाहत आहे. या परिसरात सुमारे एक हजारांहून अधिक लहान-मोठ्या कंपन्या कार्यरत असून केमिकल, अभियांत्रिकी, औषधनिर्मिती तसेच विविध उत्पादन करणारे उद्योग येथे आहेत. त्यामुळे या औद्योगिक परिसरात लागलेली आग गंभीर स्वरूप धारण करण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अंबरनाथ येथील आनंदनगर एमआयडीसी परिसरातील एका केमिकल कंपनीला सोमवारी सायंकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक पदार्थांचा साठा असल्याने आगीचे धुराचे प्रचंड लोट बदलापूरपर्यंत दिसत होते. दरम्यान, घटनास्थळी मोठे स्फोटही झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
आग लागल्याचे समजताच कंपनीतील कामगारांनी तातडीने बाहेर धाव घेतली. सुदैवाने सर्व कामगार सुरक्षित बाहेर पडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ, बदलापूर तसेच परिसरातील अग्निशामक दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
मात्र कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकलचा साठा असल्याने आग आटोक्यात आणताना अग्निशामक दलाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. घटनास्थळी प्रशासन आणि पोलिसांनीही धाव घेत परिसर सुरक्षित करण्याचे काम सुरू केले आहे.













