ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेसाठी सणासुदीचा काळ म्हणजे आनंदाचा श्वास असतो. पण या आनंदात महत्वाची भूमिका बजावणारा शासनाचा ‘आनंदाचा शिधा’ दीड वर्षांपासून गायब झालेला आहे. यंदाही गणेशोत्सव, नवरात्र, दसरा सण संपले तरी गरीबांच्या वाट्याला आनंदाचा शिधा आलेला नाही. त्यामुळे यावर्षीही सण साजरा करण्याच्या आशा मावळल्या.
महायुती सरकारने पुन्हा सत्तेत येण्यासाठी अनेक लोकप्रिय योजना आणि घोषणांचा सपाटा लावला होता. मात्र, सत्तेत आल्यानंतर आर्थिक तुटवडा येत असल्याचे कारण पुढे करत राज्य सरकारने या योजनांना निधी पुरवठा करण्यात हात आखडता घेतला आहे. त्यामुळे अनेक योजना बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातील एक योजना म्हणजे आनंदाचा शिधा वाटप योजना. ही योजना बंद होणार की चालू राहणार असा सवाल आता सामान्य जनतेकडून विचारला जात आहे.
तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात शिवजयंती, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, गुढीपाडवा, गणेशोत्सव, दिवाळी यानिमित्ताने राज्य सरकारने आनंदाचा शिधा देण्यास सुरुवात केली होती. परंतु गेल्या गणेशोत्सवाच्या काळात तो देण्यात आला नाही. त्यामुळे या योजना सुरु आहेत की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. अखेर ही योजना बंद होणार असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांत प्रसारीत झाल्या आहेत. त्यामुळे या दिवाळीत या योजनेच्या अंतर्गत हा आनंदाचा शिधा जनतेला मिळणार आहे की नाही याबाबत जनतेच्या मनात साशंकता आहे. शासनाने तातडीने या योजनेच्या संदर्भाने समोर येऊन स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. जर ही योजना बंद होणार असेल तर ती का बंद होतेय याबाबतची सत्यस्थिती शासनाने जनतेला सांगायला हवी.
उलट गणेशोत्सवाच्या काळात न दिलेला शिधा निदान या दिवाळीत द्यावा अशी आमची शासनाकडे मागणी असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
पूर्वी सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत सणासुदीच्या काळात सरकारकडून गरीबांना रेशन दुकानातून अत्यल्प दरात साखर, डाळ, रवा, तेल, हरभरा डाळ, मैदा आदी जीवनावश्यक वस्तू मिळायच्या. शंभर रुपयांत एक आनंदाचे पॅकेज मिळायचे. परंतु सध्या रेशन दुकानांत फक्त २ किलो गहू आणि ३ किलो तांदूळ यांचाच पुरवठा होत आहे. काही ठिकाणी तर एकच ठराविक धान्यच मिळते , पण बाकी सर्व वस्तू गायब आहेत.
सध्या बाज-ारात डाळ, तेल, रवा, साखरेचे दर गगनाला भिडले. परिणामी गरीबांना या वस्तू बाज- ारातून घेणे परवडणारे राहिलेले नाही. पूर्वी शिधा मिळत असल्याने सण साजरे करता येत होते. आता मात्र सणच ओसरून जात आहेत. गरीब मोलमजुरी करून कसेबसे पोट भरतोय, त्यात सणाच्या काळातही आनंद न मिळाल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. गतवर्षी आनंदाचा शिधा मिळायचा, तेव्हा सण गोड व्हायचे. यंदा अनेक सण गेले तरी काहीच मिळाले नाही. दिवाळीला तरी सरकार काही देईल का? असा सवाल शिधा धारकांनी उपस्थित केला आहे.
गोरगरीब कुटुंबांना सण आनंदात साजरे करता यावेत यासाठी मागील तीन वर्षांपासून सुरू असलेली ‘आनंदाचा शिधा’ ही महत्त्वपूर्ण योजना यंदाच्या दिवाळीतही लाभार्थ्यांना मिळणार नाही. गणेशोत्सवापाठोपाठ दिवाळीतही हा शिधा न मिळाल्याने, राज्य सरकारने ही योजना अघोषितपणे बंद केल्याची चर्चा सुरू झाली आहे.
आनंदाचा शिधा’ या योजनेवर आमदार रोहित पवार यांनीसुद्धा त्यांचं मत व्यक्त केले आहे. ‘निवडणुका सरो..मतदार मरो’ या तत्वाने काम करणाऱ्या देवा भाऊ सरकारने आता आनंदाचा शिधा योजनेवर देखील गदा आणली आहे. योजनेला निधी उपलब्ध न करून अप्रत्यक्षपणे योजनाच बंद करण्याचा नवा फॉर्म्युला या सरकारने आणला असून आनंदाचा शिधा योजनेबत देखील तेच होताना दिसत आहे… गणपती नंतर दिवाळीत देखील आनंदाचा शिधा मिळणार नसल्याचं समोर येत आहे.
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणलेली योजना म्हणून ही योजना बंद केली जातेय का हा संशोधनाचा विषय असला तरी २० लाखांची गादी–सोफा वापरणारे अलिशान सरकार आनंदाचा शिधा योजनेसाठी निधी देऊ शकत नसेल तर मग या सरकारला काय म्हणावे? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
मराठवाडा आणि सोलापूरसारख्या भागांमध्ये नुकत्याच उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले. घरातील धान्याची नासाडी झाली आहे. अशावेळी दिवाळीसाठी ‘आनंदाचा शिधा’ पुरवला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, दिवाळी तोंडावर आली तरी शासनस्तरावर कोणतीही हालचाल नसल्याने अतिवृष्टी बाधितांनाही या योजनेचा तात्काळ दिलासा मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
राज्य सरकारने ‘आनंदाचा शिधा’ योजना बंद करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, यावर्षी गणेशोत्सव आणि दिवाळीसाठी निधी न देऊन योजना अघोषितपणे बंद करण्याची तजवीज करून ठेवली असल्याचे बोलले जात आहे.













