जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील महत्त्वाची धार्मिक स्थळे हाय अलर्टवर ठेवण्यात आली आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरालाही संभाव्य धोका असल्याची माहिती केंद्र सुरक्षा यंत्रणांकडून मिळाली आहे. यासंदर्भात मंदिर न्यासाला अधिकृतपणे इनपुट देण्यात आले असून, त्यानुसार मंदिर प्रशासनाने तातडीने सुरक्षाविषयक काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
दि. ८ मे २०२५ रोजी न्यासाचे अध्यक्ष सदानंद सरवणकर आणि राज्यमंत्री दर्जा यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर व्यवस्थापन समितीची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सुरक्षा यंत्रणांकडून प्राप्त झालेल्या अलर्टच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात भक्तांच्या वावरावर काही निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार रविवार, दि. ११ मे २०२५ पासून पुढील आदेश येईपर्यंत भक्तांनी श्रींना नारळ, हार, फुले, मिठाई इत्यादी अर्पण करणे तात्पुरते थांबवावे लागणार आहे. तथापि, धार्मिक भावना लक्षात घेऊन दूर्वांची जुडी आणि जास्वंदीचे फूल मंदिरात आणण्यास सध्या तरी मनाई नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. हे उपाय पूर्णतः तात्पुरते असून केवळ सुरक्षा यंत्रणांच्या सूचनांच्या आधारे लागू करण्यात आले आहेत.
मंदिर प्रशासनाने भाविकांना आवाहन केले आहे की त्यांनी देशाच्या सुरक्षेच्या हितासाठी या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा आणि सहकार्य करावे. भाविकांनी दर्शनासाठी येताना शक्यतो हलकी पिशवी, ओळखपत्र आणि आवश्यक त्या वस्तूंसहच मंदिरात यावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, या निर्णयामुळे मंदिर परिसरातील फुलविक्रेते आणि लहान व्यावसायिकांवर परिणाम होणार असल्याची शक्यता होती. मात्र, प्रशासनाने या फुलविक्रेत्यांच्या संघटनेच्या प्रतिनिधींशी बैठक घेतली. देशाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत त्यांनीही सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या व्यवसायावर परिणाम होणार असला, तरी देशहित सर्वात महत्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले.
सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईतील एक महत्त्वाचे श्रद्धास्थान असून दररोज लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे मंदिर परिसरात सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार असून CCTV, बॉम्ब स्क्वॉड, मेटल डिटेक्टर आणि विशेष तपासणी पथक सज्ज ठेवण्यात येणार आहे. सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या सूचनांनुसार भाविकांनी घाबरून न जाता सहकार्य करावे आणि सोशल मीडियावर अफवांना बळी न पडता केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.













