हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. इसवी सन पूर्व चौथ्या शतकातील विष्णू गुप्त आर्य चाणक्य या राष्ट्रपुरुषानंतर सुमारे दोन हजार वर्षांनी भारतभूमीवर संपूर्ण राष्ट्राचा विचार करणारे शिवराय जन्माला आले. दरम्यानच्या काळात अनेक सम्राट होऊन गेले ,परंतु राष्ट्रपुरुष म्हणावे असे फक्त छत्रपती शिवाजी महाराज.
१९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर श्रीमंत शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ यांच्या पोटी शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आई-वडिलांच्या संस्काराचा त्यांच्या जीवनावर खोलवर प्रभाव पडला. लहानपणापासूनच त्यांच्या अंगी मातृभूमी विषयी अभिमान व जबाबदारीची भावना होती.
वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी डोंगरदऱ्यामध्ये राहणाऱ्या मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापनेचे कार्य हाती घेतले. सन १६४५ मध्ये त्यांनी तोरणा हा पहिला किल्ला जिंकला. स्वराज्य स्थापनेच्या त्यांच्या प्रवासामध्ये त्यांनी गनिमी युद्धाच्या युक्त्यांचा वापर करून अनेक किल्ले व प्रदेश जिंकले.शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रमुख युद्ध संघर्षामध्ये सन १६५९ सालचा आदिलशहा सरदार अफजलखान सोबतचा संघर्ष, १६६० मधील बाजीप्रभू देशपांडे व सिद्धी मसुद यांची घोडखिंडी मधील लढाई, सन १६६४ मधील खुद्द शिवाजी महाराज व मुघल सरदार इनायत खान यांच्यातील सुरत जवळील लढाई,सन १६६५ मधील पुरंदर किल्ल्यावरील संघर्ष व सन १६७० मधील सिंहगडावरील लढाई यांचा समावेश होतो. महाराजांच्या जीवनातील शेवटची लढाई सन १६७९ मध्ये संगमनेर जवळ मुघल सैन्यांसोबत झाली.
केवळ सतत लढाया करत शत्रू प्रदेश जिंकणे हा उद्देश महाराजांचा कधीच नव्हता राजांनी रणांगणावर जेवढे महत्त्वपूर्ण काम केले त्याहून अधिक रयतेसाठी केले. अखंड हिंदुस्थानातील जनता सुखी व्हावी ही राजांची आंतरिक तळमळ होती. स्वराज्य निर्माण करून राज्याची घडी सुरळीत बसवणे हा ध्यास सतत त्यांच्या मनी होता.
राजांनी मिळालेल्या धनाचा उपयोग स्वतःसाठी न करता रयतेसाठी कल्याणकारी योजना राबवण्यासाठी केला. किल्ल्यांची डागडूजी केली, नवीन किल्ले बांधले,अश्व शाळा उभारल्या, किल्ल्यांवर देवदेवतांची मंदिरे बांधली,साधुसंतांचा गौरव केला,बाजारपेठा बांधल्या,जलदुर्गांच्या रक्षणासाठी आरमार उभारले. राज्याचा सर्व बाजूंनी विचार करून सुप्रशासन बनवले.
चातुर्यनीती,राजनीति व वेळ प्रसंगी माघार घेण्याची समय सूचकता महाराजांच्या अंगी होती. राज्यातील स्त्रियांची सुरक्षितता,शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवणे, शासनातील कठोरपणा, प्रामाणिकपणा असे अनेक गुण त्यांच्या ठाई दिसतात. एक कल्याणकारी शासक म्हणून राजे आजही सर्वांसाठी आदर्श आहे. महाराजांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे ६ जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावरील त्यांचा झालेला राज्याभिषेक सोहळा. हा कार्यक्रम म्हणजे सार्वभौमत्वाची घोषणा व मराठा साम्राज्याची औपचारिक स्थापना होती. याच किल्ल्यावर ३ एप्रिल १६८० रोजी शिवाजी महाराजांचे निधन झाले.राजांच्या निधनानंतर स्वराज्यामध्ये पोकळी निर्माण झाली. परंतु त्यांचा वारसा पुढे चालवत शिवपुत्र संभाजी राजांनी आपले कार्य सुरूच ठेवले.
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. सन १८९५ मध्ये लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केला. इंग्रजी राजवटी विरुद्ध तरुणांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना वाढीस लागावी हा त्यामागील मुख्य उद्देश होता. शिवजयंती म्हणजे केवळ उत्सव न होता शिवरायांचा विचार आणि आचार अंगी बाणण्याचा संकल्प दिन व्हावा हीच अपेक्षा आजच्या मंगल दिवशी व्यक्त करूया.
श्री.राहुल चातुर
अध्यक्ष,अ.भा.बालकुमार साहित्य संस्था शाखा,शिरूर













