वर्धा: सावंगी (मेघे) बायपासवरील पुलाजवळ शुक्रवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तिघा दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला.
मृतांमध्ये क्रिश राहुल ठाकरे (१४, रा. सालोड हिरापूर), अभय राजू चौरसिया (१९, रा. बोरगाव मेघे) आणि वैभव संतोष भंडारे (२२, रा. बोरगाव मेघे) यांचा समावेश आहे.
प्राप्त माहितीनुसार, वैभव, अभय आणि क्रिश हे तिघे दुचाकीवरून आपापल्या घरी परतत होते. सावंगी (मेघे) बायपासवरील पुलाजवळ भरधाव मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात क्रिश आणि अभय यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर वैभवला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच सावंगी (मेघे) पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. मालवाहू वाहनाच्या चालकाला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध सावंगी (मेघे) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृतांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.













