महाड प्रतिनिधी:
महाड तालुक्यातील बिरवाडी शहरातील मच्छी मार्केट सध्या वाहतूक कोंडीमुळे चर्चेचा विषय ठरले आहे. या कोंडीमुळे स्थानिक व्यापाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बिरवाडी हायस्कूल बाजारपेठ येथील नवीन पूल बांधणीचं काम सुरू असताना ठेकेदाराने पर्यायी मार्ग न सोडल्याने ही समस्या निर्माण झाल्याचा आरोप स्थानिक व्यापाऱ्यांनी केला आहे.

गेल्या महिन्याभरापासून पुलाचे काम अपूर्ण अवस्थेत असून, मच्छी मार्केट परिसर रहदारीचा केंद्रबिंदू बनला आहे. दै. सह्याद्रीचा राखणदार या वृत्तपत्रात याबाबत सविस्तर बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर वाहतूक पोलिसांनी तातडीने दखल घेतली.
काल वाहतूक पोलिसांनी अवैध पार्किंग करणाऱ्या वाहनांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली. पोलिसांनी स्पष्ट केले की अशा प्रकारे रोज कारवाई केली जाईल. वाहतुकीचा मार्ग मोकळा करण्यासाठी मच्छी मार्केटमध्ये वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नेमणूक करण्यात येणार आहे.
वाहतूक पोलिसांच्या या कारवाईमुळे स्थानिक व्यापाऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र, नवीन पूल बांधणीचे काम कधी पूर्ण होईल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.












