
अहिल्यानगर :आपल्या देशात ‘सेक्युलर’ वादी राज्यव्यवस्था स्वीकारल्यामुळे केवळ मंदिरांचे सरकारीकरण आणि त्या मंदिरांचा भ्रष्टाचार, पैसे घेऊन ‘व्हीआयपी दर्शन, मंदिरांची भूमी बळकावणे, ‘वक्फ बोर्ड’ चे मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण चालू आहे.अशा वेळी मंदिर संस्कृतीचे रक्षण करणे हे हिंदू समाजाचे दायित्व आहे. त्यानुषंगाने मंदिराच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघ, मुंबई येथील श्री जिवदानी देवी संस्था, श्री ज्योतिर्लिंग भीमाशंकर देवस्थान, श्री साई पालखी निवारा आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २४ आणि २५ डिसेंबरला शिर्डी येथील श्री साई पालखी निवारा येथे तृतीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’चे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनिल घनवट यांनी दिली.
शिर्डी येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी मालेगाव येथील श्री वैजनाथ महादेव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष निवृत्त सेनाअधिकारी मेजर किसन गांगुर्डे, नाशिक गोरेराम मंदिराचे मालक दिनेश मुठे, साई पालखी निवारा शिर्डीचे कार्यालयीन व्यवस्थापक स्वप्नील शिंदे आणि हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक प्रदीप देशमुख उपस्थित होते.
घनवट यांनी सांगितले की,आपल्या राजे-महाराजांनी मंदिरांची निर्मिती केली. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी मंदिरांचे संरक्षण केले, तसेच आक्रमकांनी उद्धस्त केलेल्या मंदिरांचे जीर्णोद्धार केले. एकूणच मंदिरांच्या समस्यांचे निवारण करणे, मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे, दर्शनरांगांचे सुनियोजन करणे, तसेच मंदिर परंपरांचे रक्षण करणे यासाठी मंदिरांचे विश्वस्त, पुजारी, भक्त आदींचे संघटन आवश्यक आहे. यासाठी या परिषदेचे आयोजन केले असून, या परिषदेला संपूर्ण महाराष्ट्रभरातून 1 हजारांहून अधिक निमंत्रित मंदिराचे विश्वस्त, प्रतिनिधी, पुरोहित, मंदिरांच्या रक्षणासाठी लढा देणारे अधिवक्ते, अभ्यासक आदी सहभागी होणार आहेत.
फेब्रुवारी 2023 जळगाव येथे पहिल्या ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेत ‘महाराष्ट्र मंदिर महासंघाची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर ओझर, पुणे येथे दुसरी परिषद झाली. त्यानंतर महासंघाचे कार्य उत्तरोत्तर वाढत असून, दोन वर्षांच्या आत ते संपूर्ण राज्यभर पोचले आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून राज्यात आठशेहून अधिक मंदिरांमध्ये वस्रसंहिता लागू करण्यात आली आहे, तर १५ हजारांहून अधिक मंदिरांचे देशभरात संघटन झाले आहे. राज्यात वक्फ बोर्डाने अनेक जमिनी बळकावल्या असून वक्फ कायदा रद्द झाला पाहिजे. राज्यात अँटी लँड ग्रॅविंग अॅक्ट लागू करावा, अशी आमची प्रमुख मागणी आहे.
एकाच धार्मियांचे मंदिरे सरकारच्या ताब्यात घेतली जातात, मग अन्य धार्मियांच्या का नाही, असा सवाल उपस्थित करत मंदिरात राजकीय हस्तक्षेप थांबला पाहिजे ,यासाठी ही राज्यस्तरीय परिषद असल्याचे त्यांनी म्हटले. या परिषदेसाठी ‘हिंदू फ्रंट फॉर जस्टिस’चे प्रवक्ते आणि सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु जैन, स्वातंत्र्यवीर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर, संपादक प्रसाद काथे, जैन मंदिराचे गिरीश शहा डॉ.अमित थढाणी, लेखक संदीप सिंह, बाणगंगा ट्रस्टचे ऋत्विक औरंगाबादकर यासह श्री अष्टविनायक मंदिरांचे विश्वस्त, महाराष्ट्रातील जोतिर्लिंग देवस्थानांचे विश्वस्त, संतपिठांचे प्रतिनिधी, अन्य मंदिरांचे विश्वस्त, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.
या मंदिर परिषदेत मान्यवरांचे मार्गदर्शन, मंदिरांशी निगडीत ‘मंदिरे सनातन धर्मप्रचाराची केंद्रे बनवणे’, ‘मंदिरे सरकारीकरण मुक्त करणे’, ‘वक्फ कायद्या’द्वारे मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण आणि मंदिरे बळकावणे यावर उपाय, मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांच्या परिसरात मद्य-मांस बंदी, दुर्लक्षित मंदिरांचा जीर्णोद्धार आदी विषयांवर चर्चा होणार आहे.
साई मंदिरात ड्रेस कोड लागू होणार ?
देशाचे पंतप्रधान मंदिरात जाताना नियम पाळतात तर सर्वसामान्य माणसांनी का पाळू नये, मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यासाठी आम्ही सरकारकडे मागणी केली आहे. भाविकांची गैरसोय झाली नाही पाहिजे. सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या देशातील नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डी येथील श्री साईमंदिरात ड्रेस कोड लागू करावा, अशी आग्रही मागणी शिर्डीतील या परिषदेत असणार आहे.
सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ.












