पुलगाव – गेल्या काही महिन्यांपासून अंगणवाडी मधून मिळणारा पोषण आहार हा खाण्यायोग्य नसल्याच्या तक्रारी वारंवार करण्यात येत आहे.गौरक्षण फैल अंगणवाडी क्रमांक 110 मधून दिलेल्या पोषण आहारात खडे व गारगोटी निघाल्याचे पुढे आल्यानंतर तक्रारींचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. शहरासह ग्रामीण भागातील अंगणवाडीमध्ये देण्यात आलेल्या संपूर्ण पोषण आहाराची तपासणी करून चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनच्या योजने अंतर्गत दर महिन्याला सहा महिन्याचे बालका पासून तीन वर्षाच्या बालकापर्यंत पोषण आहार देण्याची योजना आहे. कुपोषण टाळणे, बालकाचे आरोग्य सुदृढ राहावे, पोषक आहार त्यांना मिळावा, या हेतूने ही योजना कार्यान्वित करण्यात आली. शासना अंतर्गत अंगणवाडीत शिक्षण घेणाऱ्या बालकांना खिचडीचे पॉकेट देण्यात येते. स्थानिक गौरक्षण फैल अंगणवाडी क्रमांक 110 मध्ये नुकताच पोषण आहार वितरित करण्यात आला. खिचडीचे पॉकेट घरी नेल्यानंतर फोडून पाहिले. तेव्हा त्यामध्ये खडे व गारगोटी आढळून आल्या. ही बाब चर्चेत आल्यानंतर निकृष्ट पोषण आहाराचे वृत्त प्रकाशित झाले.
उघडकीस आलेल्या प्रकारानंतर पोषण आहाराच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. बालकांचे कुपोषण टाळण्याकरिता पोषण आहार देण्यात येतो.त्यातून बालकाच्या आरोग्यात सुधारणा होण्याऐवजी बालकांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता अधिक दिसू लागली आहे. निकृष्ट दर्जाचा पोषण आहार शहरासह ग्रामीण भागातील किती अंगणवाडी केंद्रात वितरित झाला, याची तातडीने चौकशी करण्यात यावी. पोषण आहाराचे नमुने घेऊन तपासणी करावी, बालकांना दिलेला पोषण आहार खाण्याकरिता योग्य आहे किंवा नाही याबाबतचा अहवाल प्रकाशित करावा. अयोग्य पोषण आहाराचे वितरण करणाऱ्या यंत्रणेवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आदी मागण्या शहर काँग्रेसच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आल्या आहे.