गडचिरोली:एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय,अहेरी अंतर्गत समाविष्ट शासकीय तथा अनुदानित आश्रम शाळेतील प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक असे तब्बल २१६ शिक्षकांचे वार्षिक पगारवाढ थांबविल्याने शिक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय,अहेरी अंतर्गत येत असलेल्या शासकीय आश्रम शाळेतील ६७ आणि अनुदानित आश्रम शाळेतील १४९ शिक्षकांचा यात समावेश असून ६५ शिक्षकांची तीन वर्षांकरिता,१३८ शिक्षकांची दोन वार्षकरिता आणि १३ शिक्षकांची वेतनवाढ एक वर्षाकरिता असे तब्बल २१६ शिक्षकांचे पगारवाढ अहेरीचे प्रकल्प अधिकारी वैभव वाघमारे यांनी रोखली आहे.
अहेरी प्रकल्पात ११ शासकीय आणि १५ अनुदानित असे एकूण २६ आश्रम शाळेतून हजारो आदिवासी विध्यार्थी निवासी स्वरूपात राहून शिक्षण घेतात.मात्र,येथील बहुतांश विद्यार्थ्यांना मराठी उतारा वाचता न येणे,बेरीज, वजाबाकी करता न येणे,गणितातील मूलभूत क्रिया न येणे,प्रथम भाषा वाचता न येणे एकूणच विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता खालावल्याचा ठपका ठेवत प्रकल्प अधिकारी वैभव वाघमारे यांनी प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे वार्षिक पगारवाढ रोखले आहे. ही परीस्थिती केवळ प्राथमिक आणि माध्यमिक मध्येच नसून उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांमध्ये देखील आढळून आल्याने आश्रम शाळेच्या शिक्षण प्रणालीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.विशेष म्हणजे एवढया मोठ्या संख्येने शिक्षकांवर पगारवाढ रोखण्याची ही पहिली घटना असून याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्यामुळे आश्रम शाळेच्या शिक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
…..अन्यथा होणार प्रशासकीय कारवाई
आश्रम शाळेतील विध्यार्थ्यांना मूलभूत कौशल्य आत्मसात होणे गरजेचे आहे.त्यांना संख्या ज्ञान,वाचन,लेखन, बेरीज,वजाबाकी, गुणाकार,भागाकार करता आला पाहिजे. या सोबतच आदी बाबींकडे विशेष लक्ष देऊन येत्या ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत किमान ७०℅ विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक बदल घडवून आणणे अनिवार्य आहे.सदर कारवाई किरकोड स्वरूपाची असून दिलेल्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ न झाल्यास शिक्षकांना प्रशासकीय कारवाईला सामोरे जावे लागेल असा ईशारा अहेरीचे प्रकल्प अधिकारी वैभव वाघमारे यांनी दिला आहे.