गडचिरोली:माओवादाच्या हिंसक वाटेचा त्याग करून समाजाच्या मुख्य प्रवाहात परतलेल्या आत्मसमर्पित महिला माओवादी सदस्यांच्या आयुष्यात विश्वास, आपुलकी आणि नव्या आशेचा संदेश देत गडचिरोली पोलीस दलाने अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले. नवजीवन वसाहत, नवेगाव येथे आयोजित या कार्यक्रमात तब्बल ७० आत्मसमर्पित महिला माओवादी सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
गडचिरोली जिल्ह्यातील माओवाद संपुष्टात आणण्याच्या प्रयत्नांसोबतच हिंसाचाराचा मार्ग सोडून आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्यांचे पुनर्वसन करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलीस दलाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. शासनाच्या आत्मसमर्पण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत ८१९ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे.
याच पुनर्वसन प्रक्रियेचा भाग म्हणून गडचिरोली पोलीस दलाच्या ‘प्रोजेक्ट संजीवनी’ अंतर्गत नवजीवन वसाहत येथे रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात आत्मसमर्पित महिलांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सी-६० जवानांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला.
यावेळी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी आत्मसमर्पित महिला माओवादी सदस्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यांना भेटवस्तू देऊन त्यांचे मनोबल वाढविले. आत्मसमर्पित सदस्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने आणि सुरक्षितपणे जीवन जगता यावे, यासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान महिला पोलीस अधिकाऱ्यांनीही आत्मसमर्पित महिला सदस्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. त्यामुळे नवजीवन वसाहतीत भावनिक आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले.दरम्यान, पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी हर्षवर्धन बी. जे. आणि सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांनी पोलीस स्टेशन गडचिरोली, चातगाव तसेच पोलीस मदत केंद्र गोडलवाही येथे भेट देऊन महिला पोलीस अधिकारी, अंमलदार आणि शालेय विद्यार्थिनींसोबतही रक्षाबंधन सण साजरा केला.
गडचिरोलीसारख्या अतिसंवेदनशील भागात कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचे मनोबल वाढविण्यासाठी श्रीमती नाथीबाई दामोधर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई, भरारी प्रतिष्ठान, पुणे तसेच मुंबई शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थिनींनी राख्या पाठविल्या. या उपक्रमातून गडचिरोलीतील पोलीस बांधवांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाला पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी, अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिंसाचाराचा मार्ग सोडून नव्या आयुष्याची सुरुवात करणाऱ्या महिलांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचा आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.













