अहेरी: ग्रामसभेची अधिकृत नोटीस काढून, त्यावर सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन सभेची तारीख निश्चित करण्यात आली. गावातील विविध प्रभागांमध्येही त्याबाबत नोटीस लावण्यात आली. मात्र, ठरलेल्या दिवशी ग्रामसभा घेण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयात दाखल झाले असताना संबंधित ग्रामपंचायत अधिकारीच सभेला गैरहजर राहिल्याने ग्रामसभा होऊ शकली नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे निवेदन देत तातडीने ग्रामसभा घेण्याची मागणी केली आहे.
वेलगूर ग्रामपंचायतीने काढलेल्या नोटीसमध्ये गुरुवार, २७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा घेण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. या नोटीसमध्ये मागील ग्रामसभेचे कार्यवृत्त कायम करणे, विविध आवास योजनांतील लाभार्थी निवड, स्थानिक निधी व जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत विकासकामांची निवड, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत सिंचन विहिरींसाठी लाभार्थी निवड, शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करणे, ग्रामरक्षक दलाची स्थापना तसेच केंद्रीय वित्त आयोगाच्या निधीअंतर्गत नियोजन आराखडा तयार करणे यासह नागरिकांकडून प्राप्त अर्जांवर चर्चा करण्याचे विषय ठेवण्यात आले होते.
नोटीस पाहून सुमारे १५० ते २०० ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभेसाठी उपस्थित झाले. सरपंच व ग्रामपंचायत सदस्यही उपस्थित होते. मात्र, ग्रामसभा पार पाडण्यासाठी आवश्यक असलेले संबंधित ग्रामपंचायत अधिकारी गैरहजर असल्याने उपस्थित ग्रामस्थांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली. अखेर ग्रामसभा होणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ग्रामस्थांना निराश होऊन परतावे लागले.
दरम्यान, ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचा बहिष्कार असल्याचे कारण सांगून सभेला उपस्थित राहणार नसल्याची माहिती ग्रामस्थांना देण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. यानंतर गटविकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ग्रामसभेला उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, त्यानंतरही अधिकारी सभेला उपस्थित झाले नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली.विशेष म्हणजे, ग्रामसभा घेण्याची अधिकृत नोटीस स्वतः ग्रामपंचायत प्रशासनाकडून काढण्यात आली होती. त्यावर संबंधित अधिकाऱ्याची स्वाक्षरीही होती. त्यामुळे ग्रामसभेची तारीख निश्चित करून नागरिकांना बोलावून घेतल्यानंतर ऐनवेळी संबंधित अधिकारी गैरहजर राहिल्याने ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
ग्रामसभा रद्द झाल्यानंतर ग्रामस्थांनी एकत्र येत तहसीलदारांना निवेदन दिले. येत्या सात दिवसांच्या आत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी ग्रामसभा घेऊन नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. अन्यथा आठव्या दिवशी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.ग्रामसभा ही गावाच्या विकासाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्याचे व्यासपीठ असताना, अधिकृत नोटीस काढूनही ग्रामसभा न झाल्याने आता प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेते, याकडे वेलगूर ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.













