गडचिरोली : जंगलातील नैसर्गिक संपत्तीला आधुनिक व्यासपीठ मिळाले आणि त्यात मुलचेरा तालुक्याने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवात मुलचेरा तालुक्याने दमदार कामगिरी करत दोन पारितोषिके पटकावली. गोमनी येथील ‘जय बिरसा मुंडा नैसर्गिक शेती गट’ने प्रथम क्रमांक, तर धन्नुर येथील ‘कोया पूनेम महिला शेतकरी गट’ने तृतीय क्रमांक मिळवून तालुक्याचा नावलौकिक वाढवला.
राज्याचे कृषी मंत्री मा. ना. अॅड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते विजेत्या गटांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. जिल्ह्यातील विविध रानभाजी प्रदर्शन व विक्री गटांमधून मुलचेरा तालुक्यातील दोन गटांची झालेली निवड विशेष उल्लेखनीय ठरली.
जंगलातील भाजीपासून जिल्ह्याच्या व्यासपीठापर्यंत!
रानभाज्या म्हणजे केवळ जंगलातून मिळणारा आहार नव्हे, तर पोषण, औषधी गुणधर्म आणि स्थानिक रोजगाराची मोठी संधी आहे. या पारंपरिक नैसर्गिक संपत्तीचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवणे, रानभाज्यांचे संवर्धन करणे आणि शेतकरी तसेच महिला गटांना रोजगाराचे नवे साधन उपलब्ध करून देणे, हा महोत्सवाचा प्रमुख उद्देश होता.
मुलचेरा तालुक्यातील शेतकरी गटांनी रानभाज्यांचे केलेले आकर्षक व शास्त्रोक्त सादरीकरण, त्यांची विविधता आणि रानभाज्यांबाबतचे ज्ञान यामुळे परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. कृषी मंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनीही विजेत्या गटांच्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले.
कृषी विभागाच्या मार्गदर्शनाला शेतकरी गटांच्या मेहनतीची जोड
मुलचेराच्या या यशामागे कृषी विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन आणि शेतकरी गटांची मेहनत महत्त्वाची ठरली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, तालुका कृषी अधिकारी विकास पाटील, उपकृषी अधिकारी मनोहर दुधबावरे व सेवकदास गरमाळे, सहाय्यक कृषी अधिकारी तिरुपती कौशल्य व रोहित कोडापे तसेच बीटीएम आकाश लवटे यांचे मार्गदर्शन लाभले.
दुहेरी पारितोषिकामुळे मुलचेरा तालुक्याच्या शेतकरी गटांचा उत्साह वाढला असून, रानभाज्यांच्या माध्यमातून स्थानिक नैसर्गिक संपत्ती, पोषण आणि ग्रामीण रोजगाराला नवी दिशा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.













