गडचिरोली : जिल्ह्यातील शिक्षक भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जिल्हा परिषदेमार्फत पवित्र प्रणालीद्वारे शिक्षण सेवक व शिक्षक पदभरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, गडचिरोली जिल्ह्यासाठी एकूण ८२८ पदे भरली जाणार आहेत. पात्र उमेदवारांनी ११ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोर्टलवर आपला पसंतीक्रम नोंदवून लॉक करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. राज्यभरात ३० हजार २०९ रिक्त पदे भरण्यात येणार असून, त्यात गडचिरोली जिल्ह्यातील ८२८ पदांचा समावेश आहे.गडचिरोली जिल्ह्यासाठी जाहीर झालेल्या ८२८ पदांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीसाठी तब्बल ८१५ पदे आहेत. तर इयत्ता सहावी ते आठवीसाठी ९ पदे आणि नववी ते दहावीकरिता ४ पदे भरण्यात येणार आहेत. नववी ते दहावीतील चार पदांपैकी दोन पदे मराठी माध्यमाची, तर दोन पदे हिंदी माध्यमाची आहेत.
ही भरती शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT-२०२५) मधील प्राप्त गुणांच्या आधारे करण्यात येत आहे. संबंधित व्यवस्थापनातील रिक्त पदे तसेच आरक्षणाचा विचार करून शासनाच्या आदेशानुसार ८० टक्के पदांसाठी भरती प्रक्रिया नियोजित करण्यात आली आहे.
११ ऑगस्टपर्यंत पसंतीक्रम लॉक करणे बंधनकारक
पदनिहाय पसंतीक्रम नोंदविण्याची सुविधा ६ ऑगस्टपासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी ११ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोर्टलवर लॉगिन करून आपला पसंतीक्रम नोंदवून तो लॉक करणे आवश्यक आहे. पसंतीक्रमाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित प्रकारातील मुलाखतीशिवाय गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करण्यासाठी TAIT-२०२५ महाटीचर रिक्रूटमेंट पोर्टलवर लॉगिन करून कार्यवाही पूर्ण करावी. पदभरतीसंदर्भात काही म्हणणे किंवा तक्रार असल्यास उमेदवारांनी प्रशासनाने दिलेल्या ई-मेलवर ती सादर करावी, असेही कळविण्यात आले आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी विहित मुदतीत पसंतीक्रमाची प्रक्रिया पूर्ण करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.













