मुलचेरा : तालुक्यातील कोपरअली–विश्वनाथनगर मार्गावरील रस्त्याची झालेली दयनीय अवस्था आता विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरच परिणाम करू लागली आहे. सोमवारी (दि. 3 ऑगस्ट) पहाटे महाविद्यालयासाठी निघालेल्या सुमारे 40 ते 50 विद्यार्थ्यांना रस्त्यातच अडकून पडावे लागले. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने मानव विकास मिशनची बस पुढे नेणे धोकादायक असल्याचे सांगत चालकाने बस थांबविली. परिणामी विद्यार्थ्यांना रस्त्यावरच प्रतीक्षा करावी लागली आणि अनेकांचे महाविद्यालय गाठणेही अशक्य झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-14 एलएक्स-6569 क्रमांकाची मानव विकास मिशनची बस पहाटे 5.45 वाजता अहेरी येथून लगाममार्गे विद्यार्थ्यांना घेऊन मुलचेराकडे रवाना झाली होती. मात्र विश्वनाथनगरनंतर कोपरअलीजवळील आठवडी बाजार परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचलेला असल्याचे दिसून आले. वाहन चिखलात अडकण्याची शक्यता लक्षात घेऊन चालकाने बस पुढे नेण्यास नकार दिला. त्यामुळे बसमधील विद्यार्थ्यांना रस्त्यावरच उतरावे लागले.
या मार्गावर मागील दोन दिवसांपासून चिखलामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. खाजगी वाहनांसह एसटी आणि इतर मोठ्या वाहनांनाही या मार्गावरून प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहनांची चाके चिखलात रुतत असल्याने वाहने बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. रविवारी (दि. 2 ऑगस्ट) याच ठिकाणी एक जड वाहन अडकल्याने रस्त्याची अवस्था आणखी बिकट झाली होती.
लगाम परिसरातील शेकडो विद्यार्थी दररोज याच मानव विकास बसच्या माध्यमातून मुलचेरा येथे शाळा व महाविद्यालयात शिक्षणासाठी ये-जा करतात. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्यांना वेळेवर शाळेत आणि महाविद्यालयात पोहोचता येत नसून त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. या प्रकारामुळे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पालक आणि शिक्षकांच्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी या मार्गावर खडीकरण आणि स्लॅब ड्रेनचे काम करण्यात आले होते. मात्र पावसाळ्यात कोपरअली ते विश्वनाथनगरदरम्यान आठवडी बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. या मार्गावर दररोज शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांची मोठी वर्दळ असते.रस्त्याची सद्यस्थिती लक्षात घेता शासन आणि प्रशासनाने तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेऊन विद्यार्थ्यांसह नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे.













