अहेरी : बदलत्या शिक्षणव्यवस्थेत शिक्षकांनी केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न राहता आधुनिक अध्यापन पद्धती, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि विद्यार्थी-केंद्रित शिक्षणावर भर द्यावा. प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमता लक्षात घेऊन अभ्यासक्रमाचे नियोजन केल्यास गुणवत्तापूर्ण शिक्षणासह सर्वांगीण विकास साधता येईल, असे प्रतिपादन अहेरीचे गटशिक्षणाधिकारी सुनील आईंचवार यांनी केले.

अहेरी तालुक्यातील पहिली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद सोमवारी (२७ जुलै) जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, वेलगुर येथे उत्साहात पार पडली. यावेळी माजी पंचायत समिती उपसभापती गीता चालूरकर, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष हर्षा चुनारकर, केंद्रप्रमुख आशिष येल्लेवार, उच्च श्रेणी मुख्याध्यापक टी. बी. नैनलवार तसेच राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक खुर्शिद शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना आईंचवार यांनी शिक्षकांनी कृतीप्रधान अध्यापन, सातत्यपूर्ण मूल्यमापन आणि आनंददायी शिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचविण्याचे आवाहन केले. “प्रत्येक वर्गखोली ही विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आकार देणारी प्रयोगशाळा बनली पाहिजे,” असेही ते म्हणाले.शिक्षण परिषदेत पूर्वचाचणी, विद्या प्रवेश, सेतू अभ्यासक्रम, ई-शैक्षणिक साहित्य, निपुण महाराष्ट्र अभियान, डॉ. जयंत नारळीकर गणित-विज्ञान कार्यक्रम, पीएटी विश्लेषण, परख सर्वेक्षण-२०२७, पीजीआय नियोजन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी आदी विषयांवर केंद्रप्रमुख आशिष येल्लेवार यांनी सखोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद खांडेकर यांनी केले, तर आभार प्रभाकर आचेवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उच्च श्रेणी मुख्याध्यापक तुळशीराम नैनलवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.












