चंद्रपूर : मुसळधार पावसामुळे बाबूपेठ येथील वार्ड क्रमांक 17 मधील हनुमान मंदिर परिसर जलमय झाला असून अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरवर्षी उद्भवणाऱ्या या समस्येकडे प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, हनुमान मंदिर परिसरात जंगलाच्या दिशेने येणारे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचते. मात्र, या पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक असलेली नाले व्यवस्था आजही अपुरी आहे. परिणामी, पावसाचे पाणी थेट घरांमध्ये शिरून नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य, धान्य आणि घरगुती वस्तूंचे नुकसान होत आहे. प्रत्येक पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होत असतानाही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, वार्ड क्रमांक 17 मध्ये रस्ते आणि नाल्यांची विकासकामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. अपूर्ण कामांमुळे पाण्याचा निचरा होत नसून संपूर्ण परिसर जलमय होत आहे. नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
काही दिवसांपूर्वी स्थानिक नगरसेवकांनी समस्येवर तात्पुरता उपाय म्हणून परिसरात भराव टाकण्याचे काम सुरू केले होते. मात्र, ट्रॅक्टरच्या ये-जा संदर्भात काही नागरिकांनी आक्षेप घेतल्याने ते काम अर्धवट राहिल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी अपेक्षित उपाययोजना पूर्ण होऊ शकल्या नाहीत.
याशिवाय, परिसरातील सुमारे 10 ते 15 फूट रुंदीच्या रस्त्यावर काही ठिकाणी अतिक्रमण करून बांधकाम करण्यात आल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. या अतिक्रमणामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडथळला जात असून पाणी थेट घरांकडे वळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. संबंधित विभागाने याची सखोल चौकशी करून अतिक्रमणावर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
नागरिकांनी प्रशासनाला तातडीने पाणी निचऱ्याची प्रभावी व्यवस्था करण्याचे, रस्ते व नाल्यांची अपूर्ण कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे तसेच अतिक्रमण हटवून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा येत्या काळात तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे.













