वरोरा :– वरोरा तहसील कार्यालयाने अवैध वाळू उत्खनन प्रकरणांमध्ये जप्त करण्यात आलेली ५८ ब्रास वाळू उद्या (२८ मार्च) घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांना वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या निर्देशानुसार, जप्त वाळूचा उपयोग सामाजिक व विकासात्मक कार्यांसाठी करण्याची तरतूद आहे. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना आणि यशवंतराव चव्हाण आवास योजनेच्या लाभार्थ्यांना ही वाळू वितरित केली जाणार आहे.
सन २०२१ ते २०२४ या कालावधीत वाळू चोरीच्या ३१ गुन्ह्यांमध्ये वाहतूक करताना जप्त झालेली वाळू पोलीस ठाणे, वरोरा येथे जमा करण्यात आली होती. महसूल व वन विभागाच्या आदेशानुसार, ही वाळू गरजू घरकुल लाभार्थ्यांना मोफत वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे वाळूअभावी रखडलेली घरकुलाची कामे वेगाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
वाळू वाटपाची प्रक्रिया २८ मार्च २०२५ रोजी सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत पोलीस ठाणे, वरोरा येथे पार पडणार आहे. लाभार्थ्यांनी स्वतः वाहतूक व्यवस्था (ट्रॅक्टर/टिपर) करून उपस्थित राहणे बंधनकारक आहे. त्यांना शून्य महसुली वाहतूक परवाने तहसील कार्यालयामार्फत वितरित केले जातील.
वाळू वितरणाची प्रक्रिया काटेकोर आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी महसूल विभागाच्या मार्गदर्शनानुसार दोन विशेष पथके नेमण्यात आली आहेत. या पथकांच्या देखरेखीखाली वाळू वाटप होणार आहे. लाभार्थ्यांचे बांधकाम सुरू असल्याची खात्री करूनच त्यांना वाळू दिली जाणार आहे. तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची संपूर्ण नोंद ठेवली जाणार असून, संपूर्ण प्रक्रियेचे GPS फोटो आणि व्हिडीओ चित्रीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तहसीलदार योगेश कोटकर यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, वाळू वाटप प्रक्रियेत कोणताही गैरव्यवहार झाल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल. त्याचबरोबर, कोणत्याही परिस्थितीत वाळूचा विनियोग शासनाच्या उद्दिष्टांनुसार झाला पाहिजे, यासाठी विशेष खबरदारी घेतली जाणार आहे.
योजनेअंतर्गत राजु अण्णाजी तुमराम, अनिला हरीचंद्र नन्नावरे, नरेश प्रभाकर कोडापे, गोविंदा उध्दवराव सपाटे, रेखा रमेश भोयर, सविता विलास विडे, संगीता ऋषी कुळमेथे, ईश्वर गोमाजी परचाके, मंजुळाबाई विश्वनाथ आसुटकर, रामकृष्ण पुनाराम चौधरी, मधुकर शंकर इंगळे, दादाजी हाजी हरबाजी आसुटकर, अजाब शंकर इंगळे, वासुदेव उध्दवराव सपाटे, राजू नानाजी मेश्राम, अशोक वामन येरणे आणि मन्साराम गाविंदा मसराम या लाभार्थ्यांना प्रत्येकी ३ ब्रास वाळू वितरित करण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे वाळूअभावी रखडलेली घरकुल कामे लवकर सुरू होणार असून, घरकुल लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ गरजू नागरिकांना मिळावा आणि वाळूच्या टंचाईमुळे होणारा विलंब दूर व्हावा, यासाठी प्रशासनाने घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.













