चंद्रपूर – गायत्री परिवाराच्या वतीने आयोजित दिव्य अखंड दीप महायज्ञ आणि दिव्य ज्योती कलश पूजन सोहळ्यात प्रज्वलित झालेल्या दीपांच्या उजेडाने जीवनातील अंधःकार नाहीसा होईल, असा विश्वास राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. समाजात रोज मनामध्ये राम आणि रावण यांचे युद्ध होत असते. या संघर्षात रामच जिंकला पाहिजे, ही गायत्री परिवाराची शिकवण राष्ट्रनिर्माणासाठी मार्गदर्शक ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुंबईतील मुलुंड येथे झालेल्या या भव्य सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच डॉ. चिन्मय पंड्या, आमदार मिहिर कोटेचा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याची प्रशंसा करताना ते चांगल्या कामांत नेहमी अग्रेसर असल्याचे गौरवोद्गार काढले.
गायत्री परिवाराच्या या महायज्ञाच्या निमित्ताने आत्मशुद्धी, धर्म आणि राष्ट्रहिताच्या संकल्पना उपस्थितांसमोर मांडताना मुनगंटीवार म्हणाले, “संपूर्ण जग जिंकणाऱ्या सिकंदराने मृत्यूपूर्वी सांगितले होते की, कफन पेटीच्या बाहेर माझे दोन्ही हात ठेवा, जेणेकरून लोकांना समजेल की तो रिकाम्या हाताने जात आहे. मात्र, आपली भारतीय संस्कृती अधिक व्यापक आहे. आत्मा कधीच रिकाम्या हाताने येत नाही आणि जातही नाही. पूर्वसंचिताचे संस्कार आत्मा पुढील जन्मातही घेऊन जातो. त्यामुळे धन शेवटच्या श्वासापर्यंत उपयोगी ठरते, पण धर्माचा संस्कार पुढील जन्माच्या पहिल्या श्वासापासूनच महत्त्वाचा ठरतो.”
रामराज्याच्या संकल्पनेबाबत विचार मांडताना मुनगंटीवार म्हणाले, “लहानपणी शाळेत असताना शिक्षक रामराज्याची महती सांगायचे. महात्मा गांधीजींनीही रामराज्याचे स्वप्न पाहिले. त्यावेळी विज्ञान, संगणक, पिझ्झा हट नव्हते, तरीही रामराज्याची गरज का आहे, हा प्रश्न मला पडायचा. पण नंतर उमगले की झगमगाट हा केवळ बाह्य समाधानासाठी असतो, तर रामराज्य मनःशांतीसाठी आवश्यक आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या विविध कार्यांची प्रशंसा करताना सांगितले की, “छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातील गडकिल्ले आणि मंदिरांचे संवर्धन करण्यासाठी सुधीरभाऊंनी मोठे कार्य केले आहे. मागील वर्षी नवी मुंबईत भव्य अश्वमेध यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. त्या यज्ञाचे कर्ताधर्ता सुधीरभाऊ होते. समाज आणि धर्महिताच्या प्रत्येक कार्यात ते नेहमी पुढे असतात.”
गायत्री परिवाराने अध्यात्म आणि समाजसेवेच्या माध्यमातून जनकल्याणाची दिशा दिली आहे. या शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने देशभरातून अनेक साधक, संत आणि समाजसेवक मुंबईत एकत्र आले होते. दीप महायज्ञाच्या माध्यमातून आत्मिक उन्नतीसाठी प्रेरणा देण्याचे कार्य गायत्री परिवार सातत्याने करत आहे.
या भव्य सोहळ्यात दीपप्रज्वलनाच्या माध्यमातून अंधःकार हटवण्याचा आणि सकारात्मक ऊर्जेला बल मिळवण्याचा संदेश देण्यात आला. धार्मिक, सामाजिक आणि राष्ट्रीय उन्नतीच्या या पर्वात सुधीर मुनगंटीवार यांचा सक्रीय सहभाग महत्त्वपूर्ण ठरला.













