पाथरी (लक्ष्मण उजगरे): सन २०२१-२२ मधील पीक विमा योजनेत पाथरी आणि मानवत तालुक्यातील शेतकऱ्यांना वगळण्यात आल्यामुळे त्यांना विमा अर्थसहाय्य मिळावे, तसेच सध्याच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने बुधवारी कृषिमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्याकडे करण्यात आली आहे.
पाथरीत आमदार राजेश विटेकर आणि पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने कृषिमंत्री ना. धनंजय मुंडे यांची भेट घेतली. त्यांनी सादर केलेल्या निवेदनात पाथरी आणि मानवत तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतून वगळल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे. त्यामुळे २०२१-२२ या कालावधीत वगळलेल्या शेतकऱ्यांना विमा अर्थसहाय्य मंजूर करून द्यावे, अशी मागणी केली आहे.
तसेच, २०२२-२३ च्या पीक विमा योजनेतील उर्वरित ७५ टक्के रक्कम तातडीने मंजूर करून शेतकऱ्यांना वितरित करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी पाथरी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई तातडीने द्यावी, असेही निवेदनात नमूद केले आहे. या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, पशुधन मृत्यू, घरांची पडझड, वस्तीत पाणी शिरणे यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या निवेदनावर सभापती अनिलराव नखाते, माजी उपसभापती अरुण कोल्हे, कैलास शिंदे, बाबासाहेब शिंदे, शिवाजी कुटे, विभीषण नखाते, दत्ता वर्हाडे, बाबासाहेब नखाते, लक्ष्मण ढोले, लहुराज घांडगे, नारायण फासाटे, रामचंद्र नखाते यांसह सुमारे दोनशे शेतकरी आणि नागरिकांची सही आहे.