पाटणबोरी (निलेश सिडाम ) वारा व कोपामांडवी परिसरातील नागरिकांना गेल्या 72 तासांपासून वीज नसल्याने मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे. सना-सुदीच्या काळात वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे चक्कीवर दळण बंद पडले, पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली, आणि मोबाईल चार्जिंगसारखी इतर कामे ठप्प झाली आहेत.
पाण्यासाठी महिलांना लांबवर जाऊन पाणी आणावे लागले, तर गावातील हॅन्ड पंपवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून आले. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने कोपामांडवीचे माजी सरपंच हनुमंतू कायपेलीवार आणि वारा गावचे सरपंच प्रशांत अडपावार यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी महावितरण उपकेंद्रावर धडक दिली. “आमची वीज नाही, तर कुणाचीच नको,” असा कडक इशारा देत, अखेर वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला.
या संतप्त मोर्चात निखिल गोरे यांच्यासह दोन्ही गावांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आणि आपल्या मागण्यांसाठी ठामपणे आवाज उठवला.