वसंत चव्हाण यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते.
नांदेड प्रतीनीधी बालाजी पाटील
नांदेड दि. 26 : नांदेडचे खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत चव्हाण यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबाद येथील किम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. आज पहाटे चार वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
खासदार वसंतराव चव्हाण हे गेले अनेक दिवसांपासून आजाराशी सकारात्मक पणे झुंज देत होते पण आज अखेर हि झुंज अपयशी ठरली, व सर्वांच्या मनाला चटका लावून गेली. आपल्या जीवनातील अनेक दुःखाचे डोंगर सहजपणे पेलवत , जिल्ह्यातील प्रत्येक कुटूंबात जिव्हाळ्याचे नाते निर्माण करणारे , प्रत्येकाच्या सुख दुःखात अग्रेसर पणे सहभागी होऊन कार्य पूर्णत्वास नेणारे , जिल्ह्यातील एक सर्वसमावेशक नेतृत्व नांदेड जिल्हयानी आज गमावले , हि झीज आमच्यासाठी क्राँग्रेस पक्षासाठी कधीही न भरून येणारी आहे….
आज हैद्राबाद येथील उपचारादरम्यान सकाळी पहाटे त्यांची आजाराशी सुरू असलेली झुंज संपली आणि काँग्रेसचा एक निष्ठावान नेता हरपला असे मत डॉ रेखाताई पाटील चव्हाण यांनी व्यक्त केले.
मागील दोन दशकांत राज्य विधिमंडळाच्या दोन्हीही सभागृहांत प्रतिनिधित्व केल्यानंतर काँग्रेसचे वसंतराव चव्हाण हे वयाच्या सत्तरीत २०२४ मध्ये लोकसभेत निवडून आले होते. १९५७ पासून नांदेड जिल्ह्यात बहुतांश खासदार पहिल्याच प्रयत्नात लोकसभेवर निवडून गेले, त्या मालिकेत सरपंचपदापासून राजकीय कारकीर्द सुरू करणार्या वसंतरावांचे नावही घेतले जाते.
वसंत चव्हाण हे काँग्रेसचे प्रामाणिक, एकनिष्ठ नेते म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांचा लोकांशी दांडगा संपर्क होता. ते आमदार राहिलेले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी नांदेड मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला होता. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी त्यावेळी एकदिलाने चव्हाण यांचा प्रचार केला होता. ते साधारण दोन दशके राज्य विधिमंडळात खासदार होते. त्यानंतर वयाच्या सत्तारीनंतरही राजकारणात सक्रिय राहत त्यांनी 2024 सालची लोकसभा निवडणूक लढवली आणि भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव केला.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम केला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपनं त्यांना राज्यसभेवर घेतलं आणि त्यानंतर भाजपला नांदेड आणि हिंगोली लोकसभा जिंकण्याचा मार्ग मोकळा झाला. भाजपकडून प्रताप पाटील चिखलीकरांना पुन्हा संधी देण्यात आली तर काँग्रेसकडूनवसंतराव चव्हाणांना संधी देण्यात आली. अशोक चव्हाणांचा पाठिंब्यामुळे भाजप नांदेडची जागा सहज जिंकेल अशी चर्चा असताना मतदारांनी मात्र वेगळाच निर्णय घेतल्याचं दिसून आलं. काँग्रेसच्या वसंतराव चव्हाणांनी भाजपच्या प्रताप चिखलीकरांचा मोठा पराभव केला आणि अशोक चव्हाणांच्या जाण्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस संपली नसल्याचा संदेश दिला.
नांदेड जिल्ह्यातील काही राजकीय घराणी राजकीयदृष्ट्या बाद झाल्याचे दिसत असताना ज्या घराण्यांचा दबदबा अद्यापही कायम आहे, अशा नायगावच्या अमृतराव चव्हाण यांच्या मोठ्या घराण्यातील वसंतराव हे एक प्रतिनिधी. त्यांचे वडील बळवंतराव जिल्ह्याच्या राजकारणात दीर्घकाळ कृतिशील राहिले. आमदारकीचा त्यांचा वारसा वसंतरावांनी पुढे चालविला. अशोक चव्हाण यांच्या पक्षांतरामुळे यंदा ध्यानीमनी नसताना त्यांच्यावर अचानक लोकसभा निवडणूक लढविण्याचा प्रसंग आला आणि पहिल्या प्रयत्नातच ते यशस्वी ठरले.
सरपंच ते खासदार व्हाया आमदार
वसंत चव्हाण १९७८ साली आपल्या नायगाव या गावचे पहिल्यांदा सरपंच झाले. नंतर त्यांना जिल्हा परिषदेवर काम करण्याची संधी मिळाली. १९९० ते २००२ पर्यंत ते जिल्हा परिषदचे सदस्य म्हणून निवडून येत होते. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे ते निकटवर्तीय होते. नंतर लगेचच त्यांना राज्य विधान परिषदेवर संधी मिळाली. तेथून पुढे तब्बल १६ वर्षे ते विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात कार्यरत होते. नायगाव या गावात एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मोठा शैक्षणिक विस्तार केला आहे. जिल्ह्यात २००९ साली नायगाव विधानसभा मतदारसंघाची नव्याने निर्मिती झाल्यानंतर या मतदारसंघाचे पहिले आमदार वसंतरावच ठरले. नांदेडमध्ये अशोक चव्हाण-भास्करराव खतगावकर या नेत्यांविना काँग्रेस जिंकू शकते, हे त्यांनी मोठ्या आश्वासकतेने सिद्ध केले.
नांदेड लोकसभा मतदारसंघ हा अगदी पहिल्या म्हणजे 1952 च्या निवडणुकीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिल्याचं पाहायला मिळालं आहे. 1977 आणि 1989 चा अपवाद वगळता 2004 पर्यंत काँग्रेसचंच वर्चस्व या मतदारसंघात पाहायला मिळालं.
नांदेडमधील काँग्रेसचे वर्चस्व वसंतरावच चव्हाण यांनी कायम राखले. त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती, जिल्हा मध्यवर्ती बँकेत चेअरमन म्हणून काम केले आहे. चव्हाण भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसने नांदेड लोकसभेसाठी वसंत चव्हाण यांना रिंगणात उतरविले. नायगाव, मुखेड, देगलूरमध्ये त्यांचे वर्चस्व होते .
नांदेडमध्ये कॉलेज, शाळेच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रचार, प्रसार
वसंतराव चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यात अनेक शाळा, कॉलेजेस उभी केलेली आहेत. एज्युकेशन सोसायटीच्या या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी होतकरू, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे अशी माहिती डॉ रेखाताई पाटील चव्हाण यांनी दिली आहे