इंदापूर (प्रतिनिधी): दत्तात्रय गवळी
राज्यातील पत्रकारांच्या जीवन-मरणाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या ‘दीक्षाभूमी (नागपूर) ते मंत्रालय (मुंबई)’ पत्रकार संवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात काल बारामती येथे आयोजित पत्रकार संवाद मेळाव्यात मुंडे यांनी ही मागणी केली. या मेळाव्यात आमदार व माजी मंत्री दत्तात्रेय भरणे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने, पत्रकार संघाचे पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष निळकंठ मोहिते, जिल्हा सरचिटणीस सागर शिंदे, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, बारामती तालुका अध्यक्ष संतोष जाधव यांच्यासह शेकडो पत्रकार उपस्थित होते.
मुंडे म्हणाले, “पत्रकारांच्या अडचणी सोडवण्यासाठी पत्रकारांनी एकत्र येऊन प्रगल्भ होणे आवश्यक आहे. सरकारला ठासून विचारले पाहिजे की पत्रकारांच्या प्रश्नांबाबत त्यांचे उत्तर काय आहे? राज्यातील पत्रकारांसाठी ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया’च्या धर्तीवर स्वायत्त संस्था सरकारने स्थापन करावी. या संस्थेमार्फत पत्रकारांना अधिकृत मान्यता मिळावी.”
पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे यांनी सांगितले की, “सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गोरगरिबांचे प्रश्न सोडवणे ही पत्रकार संघटनेची भूमिका आहे. राज्यभरातून पत्रकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.”
यावेळी राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी पत्रकार संघाच्या मागण्यांचा शासन दरबारी पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. त्यांनी इंदापूरच्या पत्रकार संघाचे सामाजिक कार्य कौतुकास्पद असल्याचे नमूद केले.
प्रस्ताविक जिल्हा अध्यक्ष नीलकंठ मोहिते यांनी केले, तर आभार प्रदर्शन भीमराव आरडे यांनी मानले.