नागपूर (वैभव शहाणे) :- नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घोटाळ्यात न्यायालयाने आरोपी ठरवलेले राज्याचे माजी मंत्री काँग्रेसचे सुनील केदार यांच्याकडून बँक घोटाळ्यातील पैश्याच्या वसुलीसाठी २ ऑगस्ट पासून सावनेर येथे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले. बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सुनील केदार यांच्याकडून घोटाळ्याचे १५३ कोटी व व्याजाचे १४४४ कोटी रुपयांची वसुली करून पीडित शेतकरी व खातेदारांना २ महिन्यात वाटप करण्यात यावे, ही प्रमुख मागणी पीडित आंदोलनकर्त्यांची आहे. सोबतच वसुलीच्या कारवाईसाठी राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण केल्या जात आहे.
आंदोलनाच्या सुरुवातीला पीडित शेतकरी व खातेदारांचा बैलबंडी धडक मोर्चा काढण्यात आला आणि उपविभागीय अधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी संपत खलाटे यांना हजारोंच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. बँक घोटाळ्यात न्यायालयाने दोषी ठरवलेल्या सुनील केदार यांच्याकडून वसुलीची कारवाई करावी यासाठी भाजपाचे प्रवक्ते तसेच ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात पीडित शेतकरी, खातेदार व नागरिक या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
सुनील केदार यांनी केलेल्या २२ वर्षांपूर्वीच्या १५३ कोटीच्या घोटाळ्याचे आज १४४४ कोटी झालेले आहे. सहकार कायद्याच्या अंतर्गत न्यायालयाने दोषी ठरविलेल्या व्यक्तीकडून ते वसूल करण्याच्या दृष्टीने सहकारी संस्था अधिनियम १९६६ चे कलम ८८ अंतर्गत कायदा बनलेला आहे. या वसुलीच्या कायद्यांतर्गत सुनील केदार यांच्याकडून २ महिन्यात वसुली करून त्याचे वाटप पीडित शेतकरी आणि खातेदारांना करावे, ही आमची मागणी आहे असे डॉ .आशिष देशमुख यांनी सांगितले.
आता न्यायालयाने सुनील केदार यांच्याकडून व्याजासकट वसुलीचे आदेश दिले आहे. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने दोषसिद्धीला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. त्यांना पाच वर्षांची शिक्षासुद्धा ठोठावली आहे. वसुलीसंदर्भात ३० जुलै २०२४ ला सुनावणी ठेवली होती. मात्र सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ती पुढे ढकलली. केदारांना वाचवण्यासाठी दिलीप वळसे पाटील प्रयत्न करीत असल्याची शंका त्यानिमित्ताने निर्माण होते असे देशमुख म्हणाले. यावेळी डॉ. राजीव पोतदार, मनोहर कुंभारे, अरविंद लोधी, तुषार उमाटे, प्रकाशजी टेकाडे, विजयबाबु देशमुख, अशोकजी तांदूळकर, ओमप्रकाश कामडी, किशोर चौधरी, देवराव रडके, रामराव मोवाडे, संदीप उपाध्याय, हिमेश यावलकर, प्रमोद हत्ती, प्रफुल्ल मोहटे, अनिस , जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्यातील पीडित कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, ठेवीदार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते.
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवलेले काँग्रेसचे घोटाळेबाज माजी आमदार सुनील केदार यांच्याकडून तत्काळ व्याजासह 1444 कोटी रुपयांची वसुली करून पीडित शेतकरी व ठेवीदारांना त्याचे दोन महिन्याच्या आत वाटप करावे, या मागणीसाठी सावनेर येथे बेमुदत ठिय्या आंदोलनात सहभागी झालो. सर्वात अगोदर मी शेतकरी आहे, त्यामुळे सामान्यांना, कष्टकऱ्यांना, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मी स्वतःला कटिबद्ध समजतो.
डॉ .आशिष देशमुख