झडशी (धीरज देवतळे) :- सेलू तालुक्यातील हद्दीतील टाकळी, बोधली, रिधोरा, जामनी, मसाळा, आकोली, दिनकर नगर, हेटी, आमगाव, मदनी, बोरखेडी, मदना, तामसवाडा, माळेगावपर्यंत तसेच जंगली आमगावपर्यंत या रस्त्यावरून जातांना खड्यांचा सामना करावा लागत आहे. अनेकांची वाहने खराब झाली आहेत. काहींना मणक्यांचे आजार जडले आहेत. तसेच काहींना अपधाताचा सामना करावा लागत आहे. मात्र, प्रशासन, लोकप्रतिनिधी व राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली आत आहे.
हा भाग व्याघ्र प्रकल्पात येत असून, हा भाग जंगलव्याप्त आहे. जंगलात हिंस्र प्राणी मौठ्या संख्येने आहेत. मात्र, जीवघेण्या खड्डेमय रस्त्यातून प्रवासी नागरिकांना जंगलातून वाट काढावी लागते. प्रशासन एखादी मोठी अप्रिय घटना घडण्याची वाट बघतेय का ? असा सवाल उपस्थित होत आहे. या भागातील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून,प्रवासी व वाहनचालकांना हा मार्ग डोकेदुखी ठरत आहे. जागोजागी रस्त्यावर खड्डे असल्याने वाहन चालविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्यांची संख्या मोठी असल्याने खड्यात रस्ता की,रस्त्यात खड्डा हेच समजत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकवेळा दुचाकीस्वारांना खड्डे वाचविताना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. या भागातील बरेच रस्ते नागमोडी वळणाचे असून,काही भागातील सुरक्षा भिंती जीर्ण होऊन खचल्या आहेत.काही ठिकाणी वळणावरील लोखंडी कठडे अपघातात तुटलेले आढळून
येतात, तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टी करण्यासाठी गेल्या दोन ते तीन वर्षाच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाने लाखो रुपये खर्च केले आहेत. मात्र, दरवर्षी रस्त्याची परिस्थिती जैसे थे असल्याचे चित्र दिसून येते. तालुका हद्दीपर्यंत रस्त्याची तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टी केली जाते.
काही दिवसांनंतर पुन्हा खड्डे निर्माण होतात. त्यामुळे या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण होणे गरजेचे आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात अपधात घडत असल्याचे चित्र बरेच वेळा दिसून येते. महिला, प्रवासी, रुग्ण यांना या रस्त्यावरून प्रवास करणे जिकरीचे ठरत आहे. डांबर उखडले गेल्याने माती व धुळीचा सामना करावा लागत आहे. रस्ता कधी दुरुस्त होणार ? असा सवाल प्रवासी तसेच ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. रस्ता दुरस्त करावा अशी मागणी आहे.