अहेरी : एखाद्या कर्मचाऱ्याच्या निधनानंतर शासनाकडून मिळणाऱ्या मदतीपेक्षा त्याच्या उपचाराच्या वेळी वेळेवर मिळणाऱ्या पैशाचे मोल कितीतरी अधिक असते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या अडचणीच्या काळात पतसंस्थेने आधार देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन मुख्य वनसंरक्षक पी. जी. नरवणे यांनी केले. कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात करणे हा सर्वात मोठा टप्पा असतो,असे सांगत त्यांनी शासकीय वन कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, आलापल्लीच्या नूतन वास्तूचे लोकार्पण केले. ५ सप्टेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भामरागडचे उपवनसंरक्षक शैलेश मीना होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय वन अधिकारी (वन्यजीव) मंगेश बाळापूरे, आलापल्लीचे काष्ठ निष्कासन अधिकारी मोहम्मद आझाद, उपविभागीय वन अधिकारी शिशुपाल पवार, सहाय्यक वनसंरक्षक दीपक रामटेके उपस्थित होते. तसेच शासकीय वन कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, आलापल्लीचे अध्यक्ष आर. एस. मडावी, उपाध्यक्ष एन. आर. सिडाम, सचिव पी. एन. कैदलवार यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि संस्थेचे माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमातून पतसंस्थेची नवी वास्तू साकारली आहे, असे नरवणे यांनी सांगितले. ही वास्तू केवळ इमारत नसून वन कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक आणि सामाजिक आधाराचे केंद्र ठरावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तीला चांगली नोकरी, योग्य वेतन आणि मुलांचे चांगले शिक्षण यासोबतच आणीबाणीच्या प्रसंगी आर्थिक मदतीची गरज असते. अशा कठीण काळात पतसंस्था कर्मचाऱ्यांना आधार देण्याचे महत्त्वपूर्ण काम करत आहे, असे त्यांनी नमूद केले.
आपल्या सेवाकाळातील अनुभव सांगताना नरवणे यांनी अमरावती येथे उपवनसंरक्षक असतानाचा प्रसंग सांगितला. एक महिला गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तीच्या उपचारासाठी आर्थिक मदतीच्या अपेक्षेने त्यांच्याकडे आली होती. त्यावेळी वैयक्तिक पातळीवर केली जाणारी मदत मर्यादित असते.मात्र संघटितपणे मदत केल्यास गरजू व्यक्तीला अधिक मोठी आर्थिक मदत मिळू शकते. त्यासाठी सर्वांनी एकजूट दाखविणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.कर्मचाऱ्याला उपचाराच्या वेळी आर्थिक मदत मिळाली तर त्याचा खरा उपयोग होतो. निधनानंतर शासनाकडून मिळणाऱ्या पैशापेक्षा उपचाराच्या वेळी उपलब्ध होणाऱ्या पैशाचे मोल अधिक असते, असे उदाहरणासह स्पष्ट करत त्यांनी पतसंस्थेच्या सामाजिक जबाबदारीवर भर दिला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत पतसंस्थेचे सचिव पी. एन. कैदलवार यांनी संस्थेची पार्श्वभूमी, कार्य आणि आतापर्यंतची वाटचाल याबाबत माहिती दिली. अध्यक्ष व संचालकांनी मनोगत व्यक्त करताना पतसंस्थेच्या भविष्यातील कामकाजाबाबत भूमिका मांडली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्वा दोंतुलवार यांनी केले, तर आभार वनरक्षक नितेश मेश्राम यांनी मानले. अधिकारी, कर्मचारी आणि संस्थेच्या माजी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.
मेडिकल इन्शुरन्सचा विचार करा
कर्मचाऱ्यांच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षेसाठी पतसंस्थेने आणखी व्यापक पावले उचलावीत, अशी सूचना नरवणे यांनी केली. चांगल्या विमा कंपनीशी चर्चा करून कर्मचाऱ्यांसाठी मेडिकल इन्शुरन्सची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.पतसंस्थेलाही आर्थिक मर्यादा असतात. त्यामुळे विम्याच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना मोठ्या उपचार खर्चापासून संरक्षण मिळू शकते. भविष्यात अशा प्रकारच्या योजनांचा विचार केल्यास कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
व्यसनमुक्ती आणि आरोग्य तपासणीवर भर
वन कर्मचाऱ्यांमध्ये व्यसनाच्या घटना अधिक असल्याचे नमूद करत नरवणे यांनी चिंता व्यक्त केली. कर्मचाऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी पतसंस्थेने व्यसनमुक्ती आणि आरोग्य जनजागृतीचे उपक्रम हाती घ्यावेत, अशी सूचना त्यांनी केली.तसेच कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी होणे गरजेचे असून, पतसंस्थेने नियमित आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करावीत. यासाठी संस्थेवर अतिरिक्त आर्थिक भार पडला तरी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी असे स्तुत्य उपक्रम राबविले पाहिजेत, असे नरवणे यांनी सांगितले.













