गडचिरोली; दुर्गम आणि आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांच्या पोषण, आरोग्य आणि सुरक्षित संगोपनासाठी गडचिरोली जिल्ह्यात तब्बल ४५ समुदायाधारित पाळणाघरे सुरू करण्यात येणार आहेत. या महत्त्वाकांक्षी उपक्रमातील पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन एटापल्ली तालुक्यातील पैमा येथे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते करण्यात आले.
या पाळणाघरांमध्ये बालकांना सुरक्षित वातावरण, पोषक व वैविध्यपूर्ण आहार, आरोग्य-स्वच्छतेची काळजी आणि वयानुरूप प्रारंभिक विकासाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील मातांना रोजगार व उपजीविकेच्या कामांसाठी आवश्यक वेळ मिळणार असून, बालकांच्या संगोपनाची जबाबदारीही अधिक सुरक्षितपणे पार पाडता येणार आहे.
जिल्हा प्रशासन, महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन आणि टाटा ट्रस्ट्स यांच्या सामंजस्य करारांतर्गत ‘बाल पोषण व विकास उपक्रम’ राबविण्यात येत आहे. टाटा ट्रस्ट्सच्या सहकार्याने ‘मोबाईल क्रेचेस फॉर वर्किंग मदर्स चिल्ड्रेन’ संस्थेमार्फत एटापल्ली तालुक्यात या उपक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे.
पहिल्या एक हजार दिवसांवर विशेष भर
बालकाच्या आयुष्यातील पहिले एक हजार दिवस शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे टाटा ट्रस्ट्सच्या न्यूट्रिशन विभागाच्या प्रमुख जयीता चौधरी यांनी सांगितले. पाळणाघरातील बालकांना अंगणवाडी आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेशी जोडून गरजेनुसार वेळेत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यावरही भर दिला जाणार आहे.जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी, “भौगोलिक दुर्गमतेमुळे कोणतेही बालक आरोग्यसेवा, पुरेसे पोषण आणि सुरक्षित संगोपनापासून वंचित राहू नये,” अशी भूमिका मांडली.
डीएमएफच्या कामांचीही पाहणी
पाळणाघराच्या उद्घाटनानंतर जिल्हाधिकारी पंडा यांनी क्षेत्रीय दौऱ्यात बुर्गी येथील जिल्हा परिषद शाळेतील डीएमएफ निधीतून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. कामाची प्रगती आणि सद्यस्थितीची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली.यानंतर तोडसा शासकीय आश्रमशाळेतील नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी करून त्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. शिक्षण आणि उपलब्ध सुविधांबाबत त्यांनी विद्यार्थिनींकडून माहिती जाणून घेतली.
तोडसा प्राथमिक आरोग्य केंद्रालाही भेट देत
जिल्हाधिकाऱ्यांनी दुर्गम भागातील नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधांचा आढावा घेतला.
नागुलवाही रस्त्याच्या गुणवत्तेची तपासणी दौऱ्याच्या अखेरीस नागुलवाही येथील रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कामाची गुणवत्ता आणि प्रगती तपासली. संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाबाबत सविस्तर माहिती घेत आवश्यक बाबींवर लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या.
एटापल्ली तालुक्यातील पैमा येथे सुरू झालेले केंद्र हे या उपक्रमातील पहिले समुदायाधारित पाळणाघर आहे. येत्या काही महिन्यांत नियोजित ४५ पाळणाघरे टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असून, दुर्गम भागातील बालकांच्या आरोग्य, पोषण आणि सर्वांगीण विकासासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.













