गडचिरोली: जिल्ह्यातील एटापल्ली तालुका लोहखनिजाच्या मोठ्या साठ्यांसाठी ओळखला जातो. सुरजागड पहाडावर मोठ्या प्रमाणात लोहखनिजाचे उत्खनन सुरू आहे. या खनिजातून शासनाला मोठ्या प्रमाणात रॉयल्टी मिळत असतानाच गडचिरोलीला स्टील हब बनविण्याची घोषणा मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मात्र, याच एटापल्ली तालुक्यातील दुर्गम गावांमध्ये आजही मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे वास्तव समोर आले आहे.
एटापल्ली तालुक्यातील मुर्रेवाडा गाव त्याचेच उदाहरण आहे. स्वातंत्र्याला ८० वर्षे पूर्ण होत आली, तरी या गावापर्यंत अद्याप पक्का रस्ता आणि वीज पोहोचलेली नाही. त्यामुळे गावातील नागरिकांना आजही अंधारात आणि खडतर रस्त्यावर जीवन जगावे लागत आहे.
गर्देवाडा ग्रामपंचायत आंतर्गत येणारा मुर्रेवाडा गाव येथून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर आहे. मात्र, या सहा किलोमीटरच्या अंतरासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. रस्ता कच्चा असल्याने उन्हाळ्यात धूळ, तर पावसाळ्यात चिखल आणि खड्ड्यांमधून प्रवास करावा लागतो.
पावसाळ्यात नदी-नाले तुडुंब भरल्याने परिस्थिती आणखी गंभीर होते. त्यामुळे रुग्ण, गर्भवती महिला, विद्यार्थी आणि वृद्ध नागरिकांना या मार्गावरून प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागतो. आपत्कालीन परिस्थितीत गावापर्यंत मदत पोहोचवणेही आव्हान ठरत आहे.
लोहखनिजातून रॉयल्टी, पण गावात विकासाचा अभाव
एटापल्ली तालुक्यातून मोठ्या प्रमाणात लोहखनिजाचे उत्पादन होत आहे. या माध्यमातून शासनाला मोठ्या प्रमाणात रॉयल्टी मिळते. या रॉयल्टीच्या माध्यमातून तालुक्यातील दुर्गम भागातील रस्ते, वीज आणि इतर मूलभूत सुविधा मजबूत करण्यासाठी विकासकामांना गती देता येऊ शकते. मात्र, मुर्रेवाड्यासारख्या गावांची परिस्थिती पाहता या विकासाचा लाभ दुर्गम भागापर्यंत किती पोहोचला, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
स्टील हबच्या घोषणेसोबत दुर्गम गावांचाही विकास होणार का?
एकीकडे गडचिरोलीला स्टील हब बनविण्याची तयारी सुरू आहे. लोहखनिजाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. मात्र, औद्योगिक विकासासोबत दुर्गम गावांमधील नागरिकांच्या मूलभूत गरजांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.मुर्रेवाड्यासारख्या गावांमध्ये आजही वीज आणि पक्का रस्ता उपलब्ध नसणे ही विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे. लोहखनिजाच्या संपत्तीने एटापल्लीची अर्थव्यवस्था मजबूत होत असताना या संपत्तीचा काही भाग दुर्गम गावांच्या विकासासाठी वापरला जाणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
मुर्रेवाड्यासह गर्देवाडा ग्रामपंचायत परिसरातील दुर्गम गावांचा तातडीने सर्वेक्षण करून पक्का रस्ता, वीज आणि आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आता जोर धरत आहे. लोहखनिजाच्या माध्यमातून देशाच्या विकासात योगदान देणाऱ्या या भागातील नागरिकांच्या जीवनात विकासाचा सूर्योदय कधी होणार, हा खरा प्रश्न आहे.













