भामरागड :- भामरागड तालुक्यातील २१ मुली गत ९ वर्षापासून आदिवासी विभागांर्तगत इयत्ता १ ली ते ९ वी पर्यंतचे शिक्षण नामांकित शाळेत घेत होते.मात्र यावर्षी १० वीचा वर्ष आहे. अशातच वसतिगृह न मिळाल्याने पालक हतबल झाले असून शैक्षणिक सत्र-२०२६-२७ मध्ये मुलींना शिकवायचे कोठे? असा प्रश्न गरीब आदिवासींना पडला आहे.त्यामुळे पालकांनी पत्रकार परिषद घेऊन “ आमच्या मुलींना वसतिगृह व शाळा मिळवून द्या हो!” अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.
आदिवासी विकास विभागांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,भामरागडतर्फे ९ वर्षांपूर्वी आदिवासींच्या पाल्यांना नामांकित शाळेत प्रवेश मिळविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानुसार भामरागड तालुक्यातील २१ मुलींची इयत्ता १ लीसाठी निवड झाली. पॅराडाईस इंग्लिश मिडीअम स्कुल आरमोरी येथे वसतिगृह व शाळेत प्रवेश घेण्यात आला. सर्व मुली मन लावून अभ्यास करू लागल्या. इयत्ता ९ वी पर्यंत त्यांचे शिक्षण सुरळीत सुरू होते. शैक्षणिक सत्र२०२६-२७ करिता पालकांनी मुलींना आरमोरी येथे घेऊन गेले असता; मुलींना वसतिगृहात ठेवू शकणार नाही, असे सांगण्यात आले. हतबल झालेल्या पालकांनी प्रकल्प कार्यालय, भामरागड येथे तक्रार केली असता, अप्पर आयुक्त कार्यालय नागपूरतर्फे सूचना आली नसल्याचे सांगण्यात आले. २१ मुली पॅराडाईस इंग्लिश मिडीअम स्कूल आरमोरी येथे सी. बी. एस. ई. अभ्यासक्रमानुसार ९ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मात्र इयत्ता १० वीला महाराष्ट्र राज्य शिक्षण अभ्यासक्रम त्यांना झेपणार कसा? असा प्रश्न पालकांना पडला आहे. जर केंद्रीय शिक्षण अभ्यासक्रम ९ वी पर्यंत नसता तर, अन्य आश्रम शाळेत प्रवेश घेतला असता. हे वर्ष दहावीचे आहे व एका वर्षासाठी अभ्यासक्रम बदलला तर शैक्षणिक नुकसान होऊ शकते. शाळा सुरू होऊन दिड महिण्याचा कालावधी लोटला आहे,तरी मुली आपआपल्या घरीच आहेत. गावातील इतर मुले- मुली आपआपल्या शाळेत गेलेत. मग आपणच का घरी आहोत? असा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. निरागस मुली शाळेच्या आशेने दिवस कंठीत आहेत.
भारतीय राष्ट्रीय कॅंग्रेसचे तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत बोगामी यांच्या पुढाकाराने सर्व पालकांनी पत्रकार परिषद घेतली व मुलींच्या शिक्षणाची आभाळ होत असल्याचे सांगितले. आदिवासी विकास विभागाने त्वरित पुढाकार घेऊन मुलींना आरमोरी येथील पॅराडाईस इंग्लिश मिडीअम स्कूल व वसतिगृह येथे ठेवावे, अन्यथा दूस~या कुठल्याही केंद्रीय शिक्षण अभ्यासक्रम असलेल्या शाळेत प्रवेश मिळवून द्यावा व २१ मुलींचे होत असलेले शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी पालकांनी केली आहे.१० दिवसात या गंभीर बाबीकडे लक्ष न दिल्यास सर्व पालक प्रकल्प कार्यालय भामरागडचे आवारात उपोषणाला बसण्याचा इशारा तालुका कांग्रेसचे अध्यक्ष लक्ष्मीकांत बोगामी यांनी दिला आहे. पत्रकार परिषदेत प्रभाकर मडावी, गणपत शिडाम,सोमसाय मांजी,राजू बाकडा , सीताराम नैताम,बाजीराव गावडे, दिवाकर सडमेक ,भिका मडावी, जलमसाय मांजी,शंकर मडावी इत्यादी उपस्थित होते.
पॅराडाईज इंग्लिश मिडीयम शाळा, आरमोरीचा गुणांकन कमी आला आहे आणि सदर शाळा आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे भामरागड प्रकल्पातील 25 मुली आणि अहेरी प्रकल्पातील 18 मुले व 4 मुली असे एकूण 47 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र यावर कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. याबाबत शासनाला पत्र देण्यात आले आहे. त्याच शाळेत किंवा शासनस्तरावरून येणाऱ्या सूचनांप्रमाणे विद्यार्थ्यांचे समायोजन करण्यात येईल.
– अमर राऊत, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, गडचिरोली.













