अहेरी : जिल्हाधिकाऱ्यांनी जड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातलेली असतानाही आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांची सर्रास वाहतूक सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. पुसुकपल्लीजवळील नाल्यावर बांधण्यात आलेल्या पुलावर १५ ऑगस्ट रोजी एक जड वाहन अडकल्याने महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणाला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी ठप्प झाली.
गेल्या चार-पाच वर्षांपासून या मार्गाचे बांधकाम सुरू आहे. सुमारे १०० किलोमीटरच्या या महामार्गावर अनेक ठिकाणी पुलांचे काम सुरू असून, त्यासाठी तयार करण्यात आलेले तात्पुरते वळण मार्ग पावसाळ्यात वारंवार वाहून जात आहेत. त्यामुळे यापूर्वीही अनेकदा या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. परिस्थितीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली होती.
मात्र, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कागदावरच आणि रस्त्यावर जड वाहनांची बेफाम वाहतूक, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. संबंधित विभागाकडून या बंदीची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने तेलंगणा आणि छत्तीसगडकडे जाणाऱ्या जड वाहनांची वर्दळ सुरूच आहे. हा मार्ग इतर राज्यांकडे जाण्यासाठी तुलनेने शॉर्टकट असल्याने मोठ्या प्रमाणावर जड वाहने या रस्त्याचा वापर करतात.
याचाच फटका पुन्हा एकदा नागरिकांना बसला. पुसुकपल्लीजवळ पुलावर जड वाहन अडकल्यानंतर वाहन काढण्याचे प्रयत्न करण्यात आले; मात्र वाहन निघू शकले नाही. परिणामी मार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या आणि वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.
विशेष म्हणजे स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच नागरिकांना या त्रासाला सामोरे जावे लागले. आधीच खड्डे, अपूर्ण बांधकाम, तात्पुरते वळण मार्ग आणि पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यामुळे नागरिकांचा जीव मुठीत धरून प्रवास सुरू असताना आता बंदी असलेल्या जड वाहनांमुळे पुन्हा वाहतूक ठप्प होण्याची वेळ आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातल्यानंतरही जड वाहने रस्त्यावर धावत असतील, तर बंदी आदेशाची अंमलबजावणी कोण करणार? संबंधित विभाग नेमका कोणाच्या दबावाखाली किंवा कोणाच्या दुर्लक्षामुळे कारवाई करत नाही? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
एकूणच, ‘जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धाब्यावर, जड वाहनांना मोकळे रान’ अशी परिस्थिती निर्माण झाली असून, संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वारंवार वाहतूक ठप्प होऊनही ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.













