भामरागड:-भामरागड तालुक्यातील चिचोडा येथील 35 वर्षीय गरोदर माता जन्नी पुसू नैताम यांचा तसेच तिच्या पोटातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुरुवातीला आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाल्याच्या बातम्या पसरल्या होत्या, मात्र यात आरोग्य विभागाचा दोष नसून पतीच्या हट्टाग्रही स्वभावामुळेच माता व बाळाला जीव गमवावा लागल्याचे समोर आले आहे.गरोदर असलेल्या तानीला शारीरिक त्रास जाणवू लागल्याने तिला लोकबिरादारी रुग्णालय, हेमलकसा येथे दाखल करण्यात आले होते. तेथे तिची प्रकृती खालावल्याने पुढील उपचारांसाठी 6 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 3.30 वाजता तिला ग्रामीण रुग्णालय, भामरागड येथे हलवण्यात आले.येथे तपासणी केल्यानंतर तिच्या शरीरातील कोणताही घटक सामान्य नसल्याचे निदान झाले. त्यामुळे डॉ. देशक सहारे यांनी तिला तातडीने उपजिल्हा रुग्णालय, अहेरी येथे हलवण्याचा सल्ला दिला. मात्र तानीचे पती पुसू नैताम यांनी बाहेर नेण्यास ठाम नकार दिला. आरोग्य विभागाचे अधिकारी व तज्ञांनी त्यांना अनेकवेळा समजावले, तरीही त्यांनी कोणाचेही ऐकले नाही आणि पत्नीला परत घरी, चिचोडा येथे घेऊन गेले.त्यानंतर 11 ऑगस्ट 2026 रोजी जन्नीची प्रकृती पुन्हा बिघडली. तिला आरोग्य उपकेंद्र, चिचोडा येथे नेण्यात आले. प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने रात्री 9.00 वाजता परिचारिकेने तिला ग्रामीण रुग्णालय, भामरागड येथे पाठवले. रात्री 10.30 वाजता तिला येथे दाखल करण्यात आले. डॉ. आकांशा देवईकर यांनी तिच्यावर प्राथमिक उपचार केले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने तिला पुन्हा उपजिल्हा रुग्णालय, अहेरी येथे रेफर करण्यात आले. मात्र रुग्णालयात जात असतानाच वाटेत जन्नीचा आणि तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला.
मी स्वत आणि आरोग्य विभागातील सर्व अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी तिला उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे पुढील उपचार घेण्याकरिता जाण्याचा सल्ला दिला आणि तिची समजूत घातले मात्र तिच्या पतीने कोणाचेही एक ऐकून घेतले नाही यामुळे अखेर तिला व तिच्या पोटातील बाळाला जीव गमवावा लागला.
-डॉ. मनीष धकाते,तालुका आरोग्य अधिकारी, भामरागड
तज्ञ पथक नेमले नाही का?
दरवर्षी पावसाळ्यात पुरामुळे भामरागड तालुक्याचा जगाशी संपर्क तुटतो. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी येथे तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक नेमण्यात येणे आवश्यक आहे. परंतु यावर्षी आरोग्य विभागाकडून अशी कोणतीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नाही. वेळेवर तज्ञ पथक असते आणि योग्य निर्णय घेतले असते, तर कदाचित जन्नी व तिच्या बाळाचा जीव वाचला असता, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.
उसणवारीचा’ खेळ कधी थांबणार?
ग्रामीण रुग्णालय, भामरागड येथे एकही कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांना फक्त 7 ते 10 दिवसांसाठी तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक देऊन रुग्णालयाचा कारभार चालवला जात आहे. येथील वैद्यकीय अधीक्षक हे वादग्रस्त असूनही त्यांच्यावर कोणतीही प्रशासकीय कारवाई झालेली नाही. ते केवळ पगाराच्या बिलावर सही करण्यासाठी येतात आणि निघून जातात.हा उसणवारीचा खेळ आणखी किती दिवस चालणार? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.













