गडचिरोली : धानोरा तालुक्यातील जपतलाई आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूची गंभीर दखल घेत आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आश्रमशाळांच्या सुरक्षा व्यवस्थेत तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश दिले. निष्काळजीपणासाठी जबाबदार संस्थाचालक व संबंधितांवर सदोष मनुष्यवधासह लागू कायद्यानुसार कठोर कारवाई करून आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्याची कार्यवाही करण्याचेही आदेश त्यांनी दिले.
मंत्री उईके यांनी जपतलाई आश्रमशाळेची प्रत्यक्ष पाहणी करून विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था, पिण्याचे पाणी, भोजन, स्वच्छता, अंथरुण-पांघरुण आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांची १५ ऑगस्टपर्यंत सुरक्षित ठिकाणी शैक्षणिक व निवासी व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
जपतलाईच्या घटनेनंतर राज्यातील सर्व ५१३ अनुदानित आश्रमशाळांची तीन महिन्यांत तृतीय पक्षीय तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या तपासणीत इमारतीची सुरक्षितता, पाणी, भोजन, स्वच्छतागृहे, आरोग्य सुविधा तसेच साप-विंचू आणि अन्य कीटकांपासून संरक्षणाच्या उपाययोजनांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे.
तसेच प्रत्येक आश्रमशाळेची छायाचित्रांसह तपासणी, विद्यार्थी उपस्थितीची आठ दिवसांत पडताळणी आणि गंभीर त्रुटी आढळल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. आश्रमशाळांमध्ये बेड-गाद्या, स्वच्छ अंथरुण-पांघरुण, शुद्ध पाणी, नियमित स्वच्छता आणि कीटकप्रतिबंधक उपाययोजना सुनिश्चित करण्यावरही भर देण्यात आला.
यानंतर मंत्री उईके यांनी मृत विद्यार्थिनी अनु गाजुर कोरेटी हिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित विद्यार्थिनींची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. विद्यार्थ्यांची सुरक्षा, आरोग्य आणि शिक्षण यामध्ये कोणतीही हलगर्जीगिरी खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.













