गडचिरोली: धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याची धक्कादायक घटना अत्यंत गंभीर असल्याचे सांगत आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणाऱ्यांची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
जपतलई आश्रमशाळेतील दुर्दैवी घटनेची गंभीर दखल घेत मंत्री डॉ. उईके यांनी सांगितले की, आश्रमशाळेत निवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची पूर्ण जबाबदारी संबंधित संस्था आणि व्यवस्थापनाची आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेत कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा अथवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.या घटनेत नेमक्या कोणत्या स्तरावर त्रुटी राहिल्या, विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, तसेच व्यवस्थापनाकडून कोणते दुर्लक्ष झाले, याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीत दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे डॉ. उईके यांनी स्पष्ट केले.
आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि आरोग्यदायी निवासी वातावरण असणे अत्यावश्यक आहे. परिसराची नियमित स्वच्छता, सर्प व इतर विषारी प्राण्यांपासून संरक्षणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, विद्यार्थ्यांची नियमित देखरेख आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय मदत मिळणे याबाबत कोणतीही कुचराई होता कामा नये, असेही त्यांनी निर्देशित केले.“विद्यार्थ्यांच्या जीविताशी संबंधित कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष सहन केले जाणार नाही. जपतलईच्या घटनेत दोषी कोणताही असो, चौकशीअंती त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल,” असा स्पष्ट इशारा आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिला.
दरम्यान, भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी राज्यातील सर्व आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची तपासणी करून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना काटेकोरपणे राबविण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहेत.













